Monday, March 30, 2026

Fertilizer Shortage : आखाती देशांतील युद्धामुळे महाराष्ट्रात खतांचा तुटवडा

Fertilizer Shortage : आखाती देशांतील युद्धामुळे महाराष्ट्रात खतांचा तुटवडा

मुंबई : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या बांधापर्यंत पोहोचले आहेत. या युद्धामुळे आखाती देशांशी होणारा आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत झाल्याने याचा सर्वाधिक फटका खतनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्याला बसला आहे. परिणामी, भविष्यात राज्यात युरियाचा मोठा तुटवडा भासण्याची शक्यता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली. या संकटाचा सामना करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

आखाती देशांतील युद्धामुळे शेतीमालाच्या आयात-निर्यातीवर १०० टक्के परिणाम झाला. भारताचा मोठा शेतीमाल या देशांमध्ये निर्यात होतो; मात्र सध्या हा मार्ग ठप्प झाल्याने राज्यातील बाजारपेठांमध्ये मालाची आवक वाढली आणि भाव कोसळले आहेत. याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बसत आहे. "निर्यात थांबल्याने स्थानिक बाजारात भाव पडले आहेत. खत निर्मितीच्या कच्च्या मालावर परिणाम झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते," असे भरणे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील हवामान बदलाबाबत सतर्क करताना कृषी मंत्र्यांनी सांगितले की, १७ एप्रिलनंतर तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने जलसंकटाची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

पंचनाम्यानंतर तातडीने मदत

राज्यात अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. प्रशासनाकडून अंतिम अहवाल प्राप्त होताच बाधित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर केली जाईल, असे आश्वासनही कृषी मंत्र्यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा