मुंबई : मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना सहा विकेट राखून जिंकला. तब्बल १३ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सने सलामीचा सामना जिंकला आहे.
आयपीएलचा हा १९ वा सीझन आहे. मुंबई इंडियन्सने याआधीच्या १८ पैकी १४ सीझनमध्ये सलामीचा सामना गमावला आहे. यातही मागील सलग १३ वर्ष मुंबई इंडियन्सची टीम सलामीच्या साखळी सामन्यात हरत होती. यामुळे मुंबई पहिला साखळी सामना हरतेच अशी नको असलेली ओळख निर्माण झाली होती. अखेर ही पराभवाची मालिका खंडीत झाली आहे.
यंदाच्या आयपीएलच्या दुसऱ्या आणि मुंबई इंडियन्सच्या पहिल्या साखळी सामन्यात वानखेडेवर रंगतदार सामना झाला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स अशा या सामन्यात प्रथम फलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्स अर्थात केकेआरने २२० धावा केल्या. मुंबईला हे आव्हान पार करणे जमेल का अशी शंका अनेकांच्या मनात असताना रोहित शर्मा आणि रयान रिकेल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी ७१ चेंडूत १४८ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने ३८ चेंडूत सहा षटकार आणि सहा चौकार मारत ७८ धावा केल्या. तो वैभव अरोराच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून आलेल्या सूर्यकुमार यादवने आठ चेंडूत सोळा धावा केल्या. अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सने चार लक्ष्य गाठले. मुंबईने चार बाद २२१ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पंड्या १८ तर नमन धीर पाच धावांवर नाबाद राहिला.
याआधी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सने पॉवरप्लेमध्ये ७८ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने ४० चेंडूत ६७ धावा केल्या. पण दुसऱ्या बाजूस विकेट जात होत्या. यामुळे केकेआरला २०० धावांच्या टप्पा ओलांडणे कठीण जाईल असे वाटत होते. पण अंगकृष रघुवंशीने २९ चेंडूत ५१ धावा केल्या. यामुळे केकेआरने २० षटकांत २२० धावा केल्या. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने ३, हार्दिक पंड्याने १ विकेट घेतली.
वैशिष्ट्ये
- मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासात केकेआर विरुद्ध २५ वा विजय मिळवला
- लक्ष्याचा पाठलाग करताना २२१ धावा करणे आणि सामना जिंकणे अशी दुहेरी यशस्वी कामगिरी मुंबईने केली. याआधी २०११ मध्ये मुंबईने चेन्नई विरुद्धच्या सामन्यात २१९ धावा करून विजय मिळवला होता. ही मुंबईची आधीची लक्ष्याचा पाठलाग करतानाची सर्वोत्तम कामगिरी होती.
- वानखेडे स्टेडियमवर नोंदवला गेलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी लक्ष्याचा पाठलाग आहे.