गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर
आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान जीवनात व्यक्तिमत्त्व आकर्षक असणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यात माधुर्य असणेही अत्यंत आवश्यक आहे. केवळ बाह्य देखावा किंवा ज्ञान यावर व्यक्तिमत्त्वाची ओळख होत नाही, तर आपल्या बोलण्यात, वागण्यात, विचारांमध्ये आणि इतरांशी असलेल्या नात्यांमध्ये असलेले माधुर्य हेच खरे व्यक्तिमत्त्व उजळवते.
माधुर्य म्हणजे काय? माधुर्य म्हणजे सौम्यता, नम्रता, प्रेमळपणा आणि सकारात्मकता. ज्या व्यक्तीच्या शब्दांत गोडवा असतो, वागण्यात आदर असतो आणि मनात सहानुभूती असते, त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आपोआपच आकर्षक बनते.
माधुर्य का आवश्यक आहे? माधुर्य असलेली व्यक्ती सर्वांना आवडते. अशा व्यक्तीभोवती सकारात्मक वातावरण निर्माण होते. तणावपूर्ण परिस्थितीतही शांततेने मार्ग काढण्याची ताकद माधुर्य देत असते. नातेसंबंध टिकवण्यासाठी आणि समाजात सन्मान मिळवण्यासाठी माधुर्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
माधुर्य कसे आणावे? १. गोड आणि संयमी भाषा वापरा : बोलताना शब्दांची निवड विचारपूर्वक करा. कटू शब्द टाळा. २. नम्रता जोपासा : अहंकार टाळून साधेपणा आणि विनम्रता अंगी बाणवा. ३. इतरांचा आदर करा : लहान असो वा मोठा, प्रत्येकाशी सन्मानाने वागा. ४. ऐकण्याची सवय लावा : फक्त बोलणेच नव्हे, तर समोरच्याचे शांतपणे ऐकणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ५. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा : परिस्थिती कशीही असली तरी सकारात्मक विचार ठेवल्यास वागण्यात आपोआप माधुर्य येते. ६. स्वतःवर नियंत्रण ठेवा : राग, मत्सर, द्वेष या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
शिक्षण आणि संस्कारांची भूमिका माधुर्य हे एका दिवसात येत नाही. ते लहानपणापासून मिळालेल्या संस्कारांमुळे आणि शिक्षणामुळे विकसित होते. घर आणि शाळा या दोन्ही ठिकाणी मुलांना नम्रता, सहकार्य, आदर यांचे मूल्य शिकवणे गरजेचे आहे. व्यक्तिमत्त्वातील माधुर्य हेच खरे सौंदर्य आहे. ते व्यक्तीला केवळ यशस्वीच बनवत नाही, तर समाजात आदरणीय स्थानही मिळवून देते. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या व्यक्तिमत्त्वात माधुर्य आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गोड बोलणे, नम्र वागणे आणि सकारात्मक विचार ठेवणे या छोट्या गोष्टींमधून मोठा बदल घडू शकतो.
“गोड बोलणे हीच खरी संपत्ती आहे. ज्याने हृदय जिंकता येते, तेच खरे व्यक्तिमत्त्व.” शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे। शिवरायांचे सलगी देणे, कैसे असे॥ - संभाजी महाराजांना पत्र आपले चालणे, आपले बोलणे आणि लोकांशी व्यवहार करणे हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा फार महत्त्वाचा भाग आहे. माणूस बोलण्याद्वारे स्वतःला उघडे करत असतो. शब्द हे शस्त्र आहे. बोलताना ते कात्रीसारखे न वापरता सुईसारखे वापरावे. कात्री कापते, सुई जोडते. माणसाचे चालणे तडफदार असले पाहिजे. त्याचे लोकांशी व्यवहार अत्यंत सौहार्द, प्रसन्न आणि सौजन्यपूर्ण हवेत. नोकरीसाठी जी मुलाखत घेतली जाते त्यामध्ये उमेदवाराचे चालणे, बोलणे आणि वागणे लक्षात घेतले जाते. समर्थ रामदासांनी त्या काळात संपन्न व्यक्तिमत्त्व असलेला उत्तम पुरुष पाहिला व त्याचे यथार्थ वर्णन केले. हा उत्तम पुरुष म्हणजे राजा शिवछत्रपती. शिवाजी महाराज कसे बोलत याची एक गोड कथा उपलब्ध आहे.
महाराज गोवळकोंड्याला गेले होते. तेथील कुतूबशहाने महाराजांना मुद्दाम आमंत्रित केले होते. महाराजांच्या स्वराज्याच्या तुलनेने कुतूबशहाचे वैभव प्रचंड होते. त्याने महाराजांना आपला प्रचंड हत्तीखाना दाखविला. शेकडो हत्ती रांगेत उभे होते. त्याने महाराजांना विचारले, “आपल्याकडे किती हत्ती आहेत?” महाराज मोठ्या धीराने म्हणाले – “आमच्या सर्व लढाया डोंगरात असतात. त्यामुळे आम्हाला हत्तीचा उपयोग नाही. मात्र हत्तीबळ असलेली हजारो माणसे आमच्याकडे आहेत.” कुतूबशहाला त्यातील काही कळले नाही. त्याने महाराजांना विचारले, “असा एखादा माणूस आम्हाला पाहायला मिळेल का?” त्या वेळी महाराजांच्या शेजारी येसाजी कंक उभा होता. त्याच्याकडे हात करून महाराज म्हणाले – “हा त्यातलाच आहे.” येसाजी कंकची बारीक आकृती पाहून त्याच्या पराक्रमाची परीक्षा घ्यावी असे कुतूबशहाला वाटले. कुतूबशहाने महाराजांची अनुमती घेतली आणि पिसाळलेल्या हत्तीशी येसाजी कंकला झुंज देण्यास सांगितले. येसाजी कंकने अवघ्या दोन मिनिटांत हत्तीची सोंड कापली आणि चित्कार करत हत्ती जमिनीवर कोसळला. कुतूबशहा थक्क झाला. त्याने आपल्या गळ्यातील सोन्याचा कंठा येसाजी कंकला बक्षीस दिला. ते बक्षीस कुतूबशहाला परत करत येसाजी कंक म्हणाला – “माझ्या गुणांचे कौतुक करायचे असल्यास आमचे महाराज समर्थ आहेत.” अशी निष्ठावान माणसे महाराजांनी तयार केली. याचे कारण त्यांच्या बोलण्यातले माधुर्य, त्यांच्या चालण्यातले शौर्य आणि त्यांच्या वागण्यातले औदार्य होय.






