कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले अभिनंदन
मुंबई : राज्यातील १०,००० पेक्षा जास्त मंजूर पदसंख्या असलेल्या शासकीय आस्थापनांच्या वर्गवारीतील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय या आस्थापनेने प्रथम स्थान प्राप्त केले आहे त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमात या उत्कृष्ट कामगिरीसाठी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा व सतिश सूर्यवंशी, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय व त्यांच्या चमूला प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांचे व संचालक सतीश सुर्यवंशी यांचे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अभिनंदन केले आहे.
सह्याद्री अतिथिगृह येथे '१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा' कार्यक्रमांतर्गत निवडलेली उत्कृष्ट कार्यालये व सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालय प्रमुखांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात यावेळी माहिती तंत्रज्ञान तथा संस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह सर्व मंत्रालय विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव सचिव यांच्यासह १५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
१५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम" सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिनस्त शासकीय आस्थापना यांच्या स्तरावर यशस्वीपणे राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत आकृतिबंध, सेवा प्रवेश नियम, पदोन्नती, सरळसेवा भरती, गोपनीय अहवाल (MAHAPAR), अनुकंपा भरती, विभागीय चौकशी, आय गॉट प्रशिक्षण व महा इ एचआरएमएस या घटकांच्या अनुषंगाने गुणांकन करण्यात आले.
या विशेष मोहिमे अंतर्गत राज्यातील १०,००० पेक्षा जास्त मंजूर पदसंख्या असलेल्या शासकीय आस्थापनांच्या विगतवारीतून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय या आस्थापनेने प्रथम स्थान प्राप्त केले आहे. व्यवसाय,शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सेवा विषयक विविध प्रक्रियांमध्ये १०० टक्के कार्यवाही पूर्ण करून प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि डिजिटल व्यवस्थापन यामध्ये उच्च दर्जा राखल्याचे या मूल्यांकनातून स्पष्ट झाले आहे.या यशामुळे राज्यातील इतर विभागांसाठीही एक आदर्श निर्माण झाला असून, शासनाच्या सेवा सुधारणा उपक्रमांना नवे बळ मिळाले आहे.






