नवी दिल्ली : मागील एक महिन्यापासून पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक देश तेल आणि गॅसच्या टंचाईचा सामना करत आहे. पण भारतात पुरेसे पेट्रोल, डिझेल उपलब्ध आहे. देशातील एलपीजीचा साठाही समाधानकारक आहे. एकीकडे ही सुसह्य अशी स्थिती असतानाच देशात लवकरच ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर पोहोचणार आहेत. ‘BW Tyr’ आणि ‘BW Elm’ हे टँकर अनुक्रमे ३१ मार्च रोजी मुंबईत आणि १ एप्रिल रोजी न्यू मँगलोर (नवे मंगळुरू) येथे पोहोचण्याची शक्यता आहे.
युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तेल व्यापारावर परिणाम झाला असताना भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. ऐन युद्ध काळात अरुंद अशा होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतासाठी ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर निघाले आहेत. या टँकरनी सामुद्रधुनी पार केली असून लवकरच ते भारतात पोहोचणार आहेत. पश्चिम आखाती क्षेत्रात अजूनही ४८५ भारतीय खलाशांसह भारताचा ध्वज असलेली एकूण १८ जहाजं अद्याप समुद्रात आहेत.
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा एलपीजी (LPG) आयातदार देश आहे. भारतात गेल्या वर्षी ३३.१५ दशलक्ष टन गॅसचा वापर केला गेला. भारताच्या एकूण गरजेपैकी सुमारे ६० टक्के गॅस हा आयात केला जातो. यामुळे ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर देशात पोहोचल्याने भारतातील एलपीजीच्या साठ्यात आणखी वाढ होणार आहे.






