Sunday, March 29, 2026

नाशिकमध्ये तथागत आंबेडकरी विचारक संघाच्या वतीने अधिवेशन पार पडले; अॅड. संदीप जाधव यांच्या “बोधगया : सत्य आणि विपर्यास” पुस्तकाचे अनावरण

नाशिकमध्ये तथागत आंबेडकरी विचारक संघाच्या वतीने अधिवेशन पार पडले; अॅड. संदीप जाधव यांच्या “बोधगया : सत्य आणि विपर्यास” पुस्तकाचे अनावरण

नाशिक : नाशिक येथे तथागत आंबेडकरी विचारक संघाच्या वतीने आयोजित भव्य अधिवेशनात अॅड. संदीप जाधव लिखित “बोधगया : सत्य आणि विपर्यास” या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रमुख उपस्थित म्हणून लाभले.

या प्रसंगी बुद्ध समाजातील मोठ्या संख्येने तरुण-तरुणी उपस्थित होते. अधिवेशनादरम्यान बुद्ध समाजाबाबत चुकीचे नॅरेटिव्ह पसरवले जात असल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. समाजात फूट पाडण्याचे तसेच परस्परांमध्ये मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न कशा प्रकारे होत आहेत, यावर सखोल आणि विस्तृत चर्चा करण्यात आली.

यावेळी आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बुद्ध समाजातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबतही विशेष चर्चा करण्यात आली. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत, बुद्ध समाजातील युवक-युवतींनी पुढाकार घेत रोजगारनिर्मितीकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले.

तसेच, समाजाने एकत्रित राहून अशा दिशाभूल करणाऱ्या प्रवाहांना ठामपणे सामोरे जाण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी सामाजिक ऐक्य, जागरूकता आणि बौद्धिक सुसंगततेवर भर देत मार्गदर्शन केले.

दरम्यान, “बोधगया : सत्य आणि विपर्यास” या पुस्तकामध्ये बोधगया येथील महाबोधी महाविहारासंदर्भातील दीर्घकालीन वाद, त्यामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच कायदेशीर पैलूंचा सखोल अभ्यास मांडण्यात आला आहे. विशेषतः महाबोधी मंदिर कायदा, १९४९ याचा तपशीलवार आढावा घेत, त्या कायद्याची भूमिका आणि परिणाम यांचे विश्लेषण पुस्तकातून करण्यात आले आहे.

लेखकांच्या मते, या कायद्यामुळे महाविहाराच्या व्यवस्थापनाला एक ठोस कायदेशीर चौकट प्राप्त झाली असून, तो कायदा रद्द केल्यास उद्भवणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच, समाजात प्रचलित असलेल्या समजुती आणि वास्तव यांमधील फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.

बोधगया हे केवळ एका समुदायाचे धार्मिक स्थळ नसून, जागतिक स्तरावर महत्त्व असलेले धम्मस्थळ आहे, या दृष्टिकोनातून लेखकांनी हा विषय संतुलित, अभ्यासपूर्ण आणि तर्काधिष्ठित पद्धतीने मांडला आहे.

सदर पुस्तकामुळे बोधगया प्रश्नाकडे अधिक व्यापक, तर्कसंगत आणि कायदेशीर दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित होत असून, या विषयावर समाजात नव्याने विचारमंथन सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा