Saturday, March 28, 2026

Crime News : यवतमाळ हादरले! अर्धवट जळालेल्या 'त्या' तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं; पहिला गळा आवळला अन् मृतदेह जाळून....

Crime News : यवतमाळ हादरले! अर्धवट जळालेल्या 'त्या' तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं; पहिला गळा आवळला अन् मृतदेह जाळून....

यवतमाळ : जोडमोहा शिवारातील तासलोट जंगलात १५ दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या खळबळजनक प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत कौशल्याने पूर्ण केला असून, मुख्य आरोपी सतीश रमेश कश्यप याला बेड्या ठोकल्या आहेत. तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, अनैतिक संबंध आणि संशयावरून ही निर्घृण हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

नेमकी घटना काय?

मृत तरुणी, राणी किशोर वानखडे, ही पतीपासून विभक्त राहत होती. तिचे आरोपी सतीश कश्यप याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र, राणीचे इतर व्यक्तींसोबतही संबंध असल्याचा संशय सतीशच्या मनात बळावला होता. याच रागातून सतीशने तिला यवतमाळला भेटायला बोलावले. त्यानंतर तिला दुचाकीवरून निर्जन अशा तासलोट जंगलात नेले. तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि सतीशने राणीचा गळा आवळून तिचा जीव घेतला. हत्या केल्यानंतर गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे राहू नये, यासाठी सतीशने आपल्या अल्पवयीन भावाच्या मदतीने मृतदेहावर पेट्रोल ओतून तो जाळण्याचा प्रयत्न केला. मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत जंगलात सोडून दोघेही पसार झाले होते.

पोलिसांनी कसा लावला छडा?

सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण (Mobile Location/CDR) यांच्या आधारे सतीशला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. या गुन्ह्यात त्याला साथ देणारा त्याचा भाऊ (विधी संघर्ष बालक) याचाही सहभाग उघड झाला आहे. पोलिस प्रशासनाचा इशारा: संशयासारख्या क्षुल्लक कारणावरून होणाऱ्या गुन्ह्यांवर पोलीस यंत्रणा कडक नजर ठेवून असून, अशा प्रकरणांत कुणाचीही गय केली जाणार नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >