Saturday, March 28, 2026

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र

मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रस्नेही करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमात राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अखत्यारीत येणाऱ्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळाने’ (एमएमबी) बाजी मारली आहे. राज्यातील ९७ संस्था आणि मंडळांच्या चुरशीच्या मूल्यमापनात २०० पैकी १९८.७५ असे विक्रमी गुण मिळवून सागरी मंडळाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, डिजिटल परिवर्तनाच्या या शर्यतीत आपला डंका वाजवला आहे.

शनिवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था, विभाग आणि अधिकाऱ्यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा बहुमान स्वीकारला. कागदविरहित प्रशासन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नियमबद्ध नागरिक सेवा अशा निकषांवर आधारित या कार्यक्रमात सागरी मंडळाने सर्व प्रवर्गांमध्ये सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळासह अन्य महत्त्वाच्या संस्थांनीही या सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केली. यामध्ये प्रामुख्याने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण आदी मंडळांचा समावेश आहे. त्यांच्या वतीने अनुक्रमे महेंद्र कल्याणकर, योगेश म्हसे, संजय मुखर्जी, एम. देवेंदर सिंह, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, लोकेश चंद्र आणि प्रमोद नाईक यांनी प्रशस्तिपत्रक स्वीकारले

प्रशासकीय अधिकाऱ्यांची चमकदार कामगिरी : मंत्रालयीन विभाग आणि सनदी अधिकाऱ्यांनीही ई-गव्हर्नन्समध्ये चमकदार कामगिरी केली. मंत्रालयीन विभागात मनीषा पाटणकर म्हैसकर (सार्वजनिक बांधकाम), मिलिंद म्हैसकर (वन विभाग), आणि संजय सेठी (परिवहन व बंदरे) यांच्यासह सात विभागांना गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी आणि छत्रपती संभाजीनगरचे जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकाऱ्यांमध्ये रोहन घुगे (जळगाव), श्रीकृष्ण पांचाळ (ठाणे) आणि वर्षा ठाकूर-घुगे (लातूर) यांच्यासह पाच जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव झाला. पोलीस परिक्षेत्रात शहाजी उमाप (नांदेड) आणि संदीप पाटील (नागपूर) यांनी उत्कृष्ट काम केले. तर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, नागपूर ग्रामीणचे हर्ष पोद्दार आणि रत्नागिरीचे नितीन बगाटे यांनीही ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये चमकदार कामगिरी केली.

Comments
Add Comment