Saturday, March 28, 2026

राज्यात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

राज्यात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

महावितरणच्या पाच वर्षांच्या दरपत्रकाला आयोगाची मंजुरी; १०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी आता प्रति युनिट ७.१० रुपये मोजावे लागणार

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे. १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांसाठी प्रति युनिट दरात सुमारे एक रुपयाची कपात करण्यात आली असून, आता त्यांना ८.१४ रुपयांऐवजी ७.१० रुपये मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या पाच वर्षांच्या वीजदर कपात याचिकेला मंजुरी दिल्याने हा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या वर्षभरापासून ही याचिका न्यायालयीन प्रक्रियेत अडकली होती. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, तांत्रिक बाबींची पूर्तता करून आयोगाने आता नवा आदेश प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे आगामी पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने वीजदर कमी होणार आहेत.

नवीन दरपत्रकानुसार, घरगुती ग्राहकांसाठी १०० ते ३०० युनिटपर्यंतचा दर १३.२३ रुपयांवरून १२.९४ पैसे इतका कमी झाला आहे. औद्योगिक ग्राहकांसाठीही दिलासा मिळाला असून, त्यांचा दर १०.८८ रुपयांवरून १०.७१ पैसे करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांच्या सवलती महावितरणने कायम ठेवल्या आहेत. दरम्यान, पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी आयोगाने ई-वाहन चार्जिंग स्टेशनसाठी २०२६-२७ या वर्षासाठी ९.५० रुपये प्रति युनिट दर निश्चित केला आहे. हा दर २०२८-२९ पर्यंत स्थिर राहणार आहे. यामुळे मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना आपल्या आवारात लघुदाब चार्जिंग केंद्र सुरू करणे अधिक परवडणारे होणार आहे.

पाच वर्षांचे वीजदर (प्रति युनिट रुपयांत)

वापर (युनिट) २०२५-२६ २०२६-२७ २०२७-२८ २०२८-२९ २०२९-३० ०-१०० ८.१४ ७.१० ७.०० ६.२० ६.०० १०१-३०० १३.२३ १२.९४ १२.७९ १२.६२ १२.६२ ३०१-५०० १७.७८ १७.३५ १७.२७ १६.३८ १६.३५ ५०० पेक्षा जास्त १९.२३ १९.१४ १९.०४ १८.४७ १८.४७

राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार

वीजदर कपातीबाबत गेले वर्षभर आयोग, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर विविध सुनावण्या झाल्या. आता संपूर्ण वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून आयोगाकडून आदेश आल्यामुळे स्पष्टता व निश्चितता आली आहे. वीजदर कपातीच्या आदेशामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. -विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, महावितरण

Comments
Add Comment