Saturday, March 28, 2026

Jyoti waghmare : ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, ते राज्य काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंनी 'साहेब' म्हटले, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंचा घणाघात

Jyoti waghmare : ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, ते राज्य काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंनी 'साहेब' म्हटले, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंचा घणाघात

नांदेड : राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शब्दांचे बोचरे वार केले आहेत. "ज्यांना स्वतःचा पक्ष आणि घर नीट सांभाळता येत नाही, ते देश किंवा राज्य काय सांभाळणार?" असा जळजळीत सवाल त्यांनी नाव न घेता उपस्थित केला. विधानपरिषदेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत वाघमारेंनी त्यांच्या नेतृत्वक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभे केले. यावेळी त्यांनी शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे यांच्या सुरात सूर मिसळत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली. "संजय राऊत आजारपण असूनही दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची खिंड लढवत आहेत. मात्र, त्यांची सुद्धा कॉलर युवराज पकडत आहेत," असे म्हणत त्यांनी ठाकरे गटातील अंतर्गत वादावर बोट ठेवले. नांदेडमधील या दौऱ्यात वाघमारेंनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

"ठाकरे गटाचे लोकसभेतील खासदार स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक करत आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता तरी वास्तव स्वीकारून शहाणे व्हावे," असा खोचक सल्ला राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी दिला आहे. ठाकरे गटात सर्व काही आलबेल नसल्याचे सांगताना त्यांनी प्रियांका चतुर्वेदी यांच्या योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अरविंद सावंत आणि चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची जागा चतुर्वेदींना देण्यात आल्याने पक्षात अंतर्गत धुसफूस असल्याचा दावा त्यांनी केला. ४० आमदार सोडून जाण्यामागे कोणताही बाह्य हस्तक्षेप नसून, ठाकरे गटातील 'विषमवाद' आणि अहंकारामुळेच पक्ष फुटल्याची टीका त्यांनी केली. एकनाथ शिंदे यांच्या मोठेपणाचा उल्लेख करताना वाघमारे म्हणाल्या की, "शिंदे हे कष्टकरी आई-वडिलांच्या संस्कारात वाढलेले 'कॉमन मॅन' आहेत. त्यांनी पदाचा अहंकार न बाळगता उद्धव ठाकरेंना नेहमीच 'साहेब' म्हणून सन्मान दिला. मात्र, उद्धव ठाकरेंनी निरोप समारंभाचे रूपांतर 'आरोप' समारंभात करून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासला आहे." अगदी लहान मुलांवरही (शिंदेंच्या नातवावर) टीका करणाऱ्या ठाकरेंनी प्रबोधनकार आणि बाळासाहेबांच्या संस्कारांचे आत्मपरीक्षण करावे, अशा शब्दांत वाघमारेंनी आपला संताप व्यक्त केला.

"ज्या नेत्याला आपले घर, सख्खा भाऊ आणि स्वतःचा पक्ष एकसंध ठेवता आला नाही, ते देश किंवा राज्य सांभाळण्याच्या गप्पा कशा मारू शकतात?" असा थेट सवाल राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केला आहे. नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. खासदारपदी नियुक्ती झाल्यापासून आपण तळागाळातील लोकांशी संवाद साधत असून, ज्यांचा आवाज दाबला गेला आहे, अशा वंचितांची ताकद बनण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाकरे गटातील अंतर्गत वादावर बोट ठेवताना वाघमारे म्हणाल्या की, "उद्धव ठाकरेंना त्यांचे चुलत भाऊ (राज ठाकरे) सोडून गेले, स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही. आज जी परिस्थिती आहे, त्यात संजय राऊत माध्यमांसमोर येऊन पक्षाची खिंड लढवत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही 'युवराज' (आदित्य ठाकरे) त्यांची कॉलर पकडत असल्याच्या बातम्या येत आहेत, तर दुसरीकडे प्रियंका चतुर्वेदीही संताप व्यक्त करत आहेत." ठाकरे गटात सध्या मोठी यादवी माजली असून, हा पक्ष अंतर्गत संघर्षातूनच लयाला जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

शिंदे-फडणवीस कुणालाही पाठीशी घालणार नाहीत

"रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, ही माहिती मला तुमच्याकडूनच (माध्यमांकडून) समजली आहे. मात्र, या प्रकरणात कोण दोषी आहे, कोण आरोपी आणि कोण सहआरोपी, याचा अंतिम निर्णय घेण्याचे काम पोलीस यंत्रणेचे आहे," असे स्पष्ट मत राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य असून ते संविधानानुसारच चालते, याची आठवणही त्यांनी करून दिली. गुन्हेगारांना इशारा देताना त्या म्हणाल्या की, भोंदू बाबाला परदेशात पळून जाऊ दिले नाही आणि पोलिसांच्या 'थर्ड डिग्री'चा मार काय असतो, हे आरोपी खरातची अवस्था पाहून समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की, सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईलच. महाराष्ट्राची संतांची परंपरा जपत असतानाच महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. विशेषतः रखडलेला 'शक्ती कायदा' लवकरात लवकर कसा मार्गी लागेल आणि तो प्रभावीपणे कसा राबवला जाईल, यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहू, असा विश्वासही खासदार वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >