मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) मुख्य समिती आणि सात परिमंडळीय समिती निवडणुकीची मतमोजणी महानगरपालिका मुख्यालयातील समिती सभागृह क्रमांक १ व २ येथे शनिवारी २८ मार्च २०२६ रोजी शांततेत आणि सुरळीतपणे सुरू आहे. मुंबईतील नगर पथविक्रेत्यांची एक मुख्य समिती आणि सात परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (सात समित्या) एकूण आठ समित्यांच्या सदस्य पदांसाठी ही मतमोजणी प्रक्रिया होत आहे.
शनिवारी २८ मार्च २०२६ रोजी परिमंडळ १, २ आणि परिमंडळ ४ ची मतमोजणी प्रक्रिया शनिवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण झाली असून उर्वरित परिमंडळांची मतमोजणी अद्याप सुरू आहे. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. त्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येईल.
दुपारी १२ वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यावेळी स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या सर्व १३६ मतपेट्या बाहेर काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या परवाना विभागाच्या जवळपास २०० ते २५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने शनिवारी दुपारी १२ वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू केली.
सर्वप्रथम मतदान पत्रिकांची आरक्षणनिहाय विभागणी करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरूवात झाली. यावेळी उप आयुक्त (विशेष) विनायक विसपुते, परवाना अधिक्षक अनिल काटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील नगर पथविक्रेत्यांची एक शिखर समिती आणि सात परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (सात समित्या) एकूण आठ समित्यांच्या निवडणुकीसाठी २९ ऑगस्ट २०२४ रोजी शांततेत आणि सुरळीतपणे मतदान पार पडले होते. त्यात सरासरी ४९.४६ टक्के मतदान झाले होते. न्यायालयात दाखल विविध याचिकांमुळे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, मतदान प्रक्रिया राबवून मतमोजणी आणि निकाल राखून ठेवण्यात आले होते.
सोमवारी २३ मार्च २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने (याचिका क्रमांक २९३३९/२०२४ व इतर) या प्रकरणावर अंतिम निकाल दिला. न्यायालयाने सन २०२४ मध्ये पार पडलेली निवडणूक प्रक्रिया 'विधिग्राह्य' ठरवत, मतमोजणीवरील स्थगिती उठवली आहे. तसेच, विनाविलंब निकाल जाहीर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. गटनेत्यांच्या सभेनंतर महापौर रितू तावडे यांनी दिलेल्या प्रशासनाला याबाबत सूचना केल्यानंतर शनिवारी मतमोजणीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत तथा पहाटेपर्यंत मतमोजणी पूर्ण होण्याचा अंदाज आहे.






