सांगली: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. केवळ चोरीच्या संशयावरून दोन निष्पाप चिमुकल्यांना उलटं टांगून रात्रभर अमानुष छळ करण्यात आला. या क्रूर अत्याचारात १० वर्षीय सानिका हिचा मृत्यू झाला, तर तिची ११ वर्षीय बहीण अनुजा गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, केवळ शेजारच्या घरात चोरी केल्याचा संशय शेजाऱ्याने घेतल्याने संतापाच्या भरात या दोन चिमुकल्यांवर त्यांच्या आई-वडिलांकडून निर्दयी अत्याचार करण्यात आला. नाना हैबत यमगर असं मुलींच्या वडिलांचं नाव आहे.
बुधवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास मुलींच्या वडिलांनीच दोन्ही मुलींना हात-पाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटं टांगलं. रात्रभर त्या चिमुकल्या वेदनेने तडफडत 'पाणी, पाणी' अशी आर्त हाक देत होत्या. मात्र, निर्दयी आई-वडिलांनी त्यांना मदत तर दूरच, पाण्याचा थेंबही दिला नाही.
रात्रभर झालेल्या छळाने पहाटे मृत्यू
असह्य वेदना सहन करताना सानिकाने रात्रीच प्राण सोडले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मुलगी मृत आणि उलटी टांगलेल्या अवस्थेत असतानाही आई-वडील त्या खाली निवांत झोपले होते. गुरुवारी सकाळी आजोबांनी मुलींना खाली उतरवलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सानिका मृतावस्थेत आढळली, तर अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती.
अनुजाला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर सानिकाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
बहिणीच्या जबाबातून उघड झाला प्रकार
अनुजा शुद्धीवर आल्यानंतर तिने डॉक्टरांना दिलेल्या जबाबात संपूर्ण प्रकार उघड झाला. 'वडिलांनी आम्हाला उलटं टांगून मारहाण केली' असं तिने सांगितल्यावर डॉक्टरांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि या अमानुष घटनेचा पर्दाफाश झाला.
सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून संबंधित आरोपींवर खून आणि खुनाच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे समाजमन हादरलं असून बालसुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






