हिंदू धर्मात चैत्र शुद्ध नवमी अर्थात 'राम नवमी' या दिवसाला फार महत्त्व आहे. यंदा २६ मार्च २०२६ रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात राम नवमी साजरा करण्यात येणार आहे. प्रभू श्रीरांमासारखा राजा पुन्हा होणे नाही त्यांच्या जन्म हा केवळ एका राजाचा जन्म नव्हता तर तो एका आदर्श व्यक्तीमत्वाचा जन्म होता. प्रभू श्री रामांच्या आदर्श जीवनाचा आणि विचारांचा खोलवर परिणाम आजही सामान्य माणसाच्या जीवनावर आणि विचारांवर जाणवतो.
प्रभू श्रीरांमाच्या जन्मापूर्वी देव आणि मानव यांच्यामध्ये फार अंतर होते. पण, प्रभू रामानं मानवी रुपात जन्म घेऊन संकटांशी कसं लढावं याची शिकवण दिली आहे.
चला तर जाणून घेऊयात प्रभू श्रीरांमाचे आदर्श
प्रभू श्रीरांमांमुळे सामान्य माणसाला कळले की, कितीही अधिकार असले तरी 'मर्यादेत' राहून कसं जगावं.
मुलगा, भाऊ, पती आणि राजा म्हणून प्रभू श्रीरांमानं जी कर्तव्यं निभावली, ती आजही प्रत्येक कुटुंबासाठी एक 'आदर्श आहे.
भारतीय कुटुंब व्यवस्थेचा कणा रामायणातील नात्यांवर आधारलेला असून लक्ष्मण आणि भरत यांचे रामावरील प्रेम 'निस्वार्थ सेवा' शिकवते. वडिलांच्या वचनासाठी राज्याचा त्याग करणं, हे 'शब्दाची किंमत' आणि 'पितृभक्ती' जपण्यास सामान्य माणसाला प्रेरित करतं. प्रभू रामाच्या या आदर्शाचा खोल परिणाम आजही पाहायला मिळतो.
प्रभू रामांचं 'रामराज्य' हा सामान्य माणसासाठी आजच्या काळातही सर्वात मोठा आदर्श आहे. प्रजेच्या सुखाकरिता राजा स्वतःच्या सुखाचा त्याग करतो, अशी शासन व्यवस्था असावी, ही संकल्पना प्रभू रामाच्या जन्मामुळे रुजली आहे.
अधर्मावर नेहमी सत्याचा विजय होतो हा विश्वास अन्याय करणाऱ्या रावणाचा अंत झाल्यामुळे, सामान्य लोकांमध्ये निर्माण झाला. प्रभू श्रीरामाने राजा असतानाही केवळ राजघराण्याशी संबंध ठेवले नाहीत, तर समाजातील शेवटच्या घटकालाही आपलंसं केलं.
प्रभू रामाने शबरीची बोरे आणि गुहक मित्राचा स्वीकार केल्यानं यामुळे समाजात जातीयता विरहित आणि प्रेमाचे संबंध असावेत, असा संदेश दिलाय. प्रभू रांमांच्या या आदर्शांमुळे सामान्य माणसाला आत्मसन्मानानं जगण्याची प्रेरणा मिळाली आहे.






