Thursday, March 26, 2026

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास सिग्नलमुक्त करण्यासाठी रबाळे, पावणे आणि तुर्भे येथे उड्डाणपूल बांधले जाणार आहेत. त्याशिवाय पाम बीच रोडच्या जंक्शनजवळ, विशेषतः नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयापाशी, एक दुहेरी भुयारी मार्ग अंडरपास तयार करण्यात येणार आहे.

सोमवारी झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि ऐरोली-वाशी येथील खाडी पुलांमुळे ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. यामुळे सकाळी आणि संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत सत्ताधारी पक्षाने व्यक्त केले.

हा प्रकल्प 'हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल' अंतर्गत राबवला जाणार आहे. यानुसार, प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ३० टक्के रक्कम सुरुवातीला दिली जाईल. तर उर्वरित ७० टक्के रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर पुढील दहा वर्षांत हप्त्यांद्वारे भरली जाईल. यामुळे महानगरपालिकेवर अचानक कोणताही मोठा आर्थिक बोजा पडणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सभागृहात हा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला असला, तरी विरोधकांनी यावर आक्षेप घेतले आहेत. प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च, कंत्राटदाराची माहिती आणि तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती यांबाबत स्पष्टता नसल्याचा दावा शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. खर्चात पारदर्शकता असावी आणि निधीचा अपव्यय होऊ नये, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Comments
Add Comment