मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू होणार आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात पहिला सामना खेळला जाणार आहे. मात्र, बीसीसीआयने यंदा ओपनिंग सेरिमनी रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
म्हणून उद्घाटन सोहळा रद्द :
मिळालेल्या माहितीनुसार, ४ जून २०२५ रोजी बंगळुरूमध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बीसीसीआयने आयपीएलच्या १९व्या हंगामाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्घाटन सोहळा रद्द मात्र समारोप सोहळ्याचे भव्य आयोजन :
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले की, या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन दिवशी कोणताही सांस्कृतिक किंवा मनोरंजन कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. मात्र, स्पर्धेच्या अखेरीस म्हणजेच ३१ मे रोजी अंतिम सामन्यादिवशी भव्य समारोप सोहळा आयोजित करण्याची योजना आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही २०१९ मध्ये पुलवामा हल्ला झाल्यानंतर आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला होता आणि त्या निधीचा उपयोग शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी करण्यात आला होता.
आता आयपीएल २०२६ ची सुरुवात सध्या पद्धतीने होणार असली तरी समारोप सोहळा मात्र भव्य स्वरूपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.