आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी ट्रॅव्हल्सची डंपरशी भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली असून, मृतांचा आकडा अधिकृतपणे १३ असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 'हरिकृष्णा ट्रॅव्हल्स'ची ही बस तेलंगणातील निर्मल येथून आंध्र प्रदेशातील नेल्लोरकडे जात होती. आज (२६ मार्च) पहाटे सहाच्या सुमारास मार्कापुरम जिल्ह्यातील रायवरमजवळ बस आणि एका डंपरची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, क्षणार्धात बसने पेट घेतला. बसमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळण्यापूर्वीच आगीने रौद्र रूप धारण केले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. पोलिसांनी सुरुवातीला मृतांची संख्या १४ सांगितली होती, मात्र नंतर मुख्यमंत्री कार्यालयाने १३ जणांच्या मृत्यूला अधिकृत दुजोरा दिला आहे. बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते, त्यापैकी २२ जण जखमी झाले आहेत. मार्कापुरमचे पोलीस अधीक्षक व्ही. हर्षवर्धन राजू यांनी सांगितले की, "अपघातात जखमी झालेल्या २२ जणांना, ज्यात डंपर चालकाचाही समावेश आहे, तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये ३५ प्रवासी प्रवास करत होते. घटनेचा पंचनामा सुरू असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे."
मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त
या भीषण अपघातावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी खोल दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांप्रती त्यांनी संवेदना प्रकट केल्या असून, जखमींना योग्य उपचार देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.






