मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या विक्रीला अखेर स्थायी समितीने मान्यता दिली आहे. पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी दरदिवशी ३ दशलक्ष लिटर पाण्याच्या खरेदीसाठी एका संस्थेला प्रति हजार लिटर हे १५ रुपये दराने पाणी विकण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. सांडपाणी प्रकिया प्रकल्पातील पाण्याच्या विक्रीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी या प्रक्रिया केलेल्या या पाणी विक्रीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट करत हा प्रस्ताव मंजूर केला.
मुंबई मलनिःसारण प्रकल्प भाग २ अंतर्गत कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्राचे काम २०२० मध्ये पूर्ण झाले आहे. त्यानंतर या केंद्राची दैनदिन देखभाल करण्यासाठी पुढील १५ वर्षांच्या कालावधीसाठी सुएझ इंडिया प्रा. लि. कंपनीची निवड केली आहे. प्रकल्पाची क्षमता प्रति दिन ३७ दशलक्ष लिटर एवढी आहे. त्यापैकी १० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर तृतीयक प्रक्रिया केली जाते यातील सांडपाणी अधिक शुध्द होऊन त्याचा पुनर्वापर पेयत्तर अर्थात पिण्या व्यतिरिक्त इतर वापरासाठी म्हणजेच बांधकाम, उद्याने, तसेच इतर सफाई कारणासाठी केला जाऊ शकतो. यासाठी कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्रामधून प्रक्रिया केलेले सांडपाण्यच्या खरेदीसाठी एस. आर. एंटरप्राजेस ही संस्था पुढे आली असून त्यांना १५ रुपये दराने एक हजार लिटर करता दर आकारुन एस.आर. एंटरप्राइजेस महिला बचत गट संस्थेला या केंद्रातून सुमारे ३० लाख लिटर प्रतिदिन (३ किलो लिटर) इतके सांडपाणी प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला असता उबाठाचे शैलेश फणसे यांनी हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्याची मागणी करत कुलाबा सारख्या परिसरामध्ये आगीसाठी लागणाऱ्या टाक्या भरण्यासाठी या पाण्याचा वापर करावा अशी सूचना केली. तसेच महसूलाकडे न पाहता या पाण्याचा अधिकाधिक वापर पिण्याव्यतिरिक्त व्हायला हवा अशी मागणी केली. तर याला भाजपचे ऍड मकरंद नार्वेकर यांनी विरोध केला. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. आता त्यांना १५ रुपये दराने द्यावे लागेल. त्यामुळे हा प्रस्ताव मंजुर करावा अशी मागणी केली. तर यावर भाजपच्या प्रिती सातम यांनी ३७ दशलक्ष लिटर पैंकी केवळ १० दशलक्ष लिटर पाण्याचाच पुनर्वापर होणार आहे. मग या प्रकल्पातून निम्म्या पाण्याचा पुनर्वापर का होत नाही अशी विचारणा केली. तसेच या कंपनीला १५ रुपये दराने पाण्याची विक्री केल्यानंतर संबंधित कंपनी टँकरद्वारे पाण्याची भरणा करणार आहे. त्यामुळे जर एका टँकरची नोंद दाखवून संबंधित कंपनी दहा टँकर भरणार नाही कशावरून असा सवाल करत त्यामुळे अशाप्रकारच्या टँकरची प्रत्येक नोंद घेण्यासाठी काय यंत्रणा असेल आणि त्यावर महापालिकेचे नियंत्रण कसे असेल याची माहिती मागितली. तर सभागृहनेते गणेश खणकर यांनी हा अशाप्रकारच्या पाण्याची विक्री करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून अशा संस्थांना उद्युक्त करायला का हरकत आहे असा सवाल करत हा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली. तर यावर एमआयएमचे जमीर कुरेशी, शीतल गंभीर, डॉ सईदा खान, आदींनी भाग घेतला.
यावर प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी या प्रक्रिया केलेल्या प्रकल्पातून पुनर्वापर केल्या जाणाऱ्या पाण्याच्या विक्रीची माहिती देत संबंधित संस्थेसोबत करारपत्र केले जाणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे या विरोधी पक्षाची फेरविचाराची सूचना अमान्य करत हा प्रस्ताव मंजूर केला.






