मुंबई: दारु पिणाऱ्यांच्या खिशाला लवकरच कात्री लागू शकते. कारण दारुच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे भारतीय मद्य बाजारपेठेत किमती वाढण्याचे संकेत मिळत आहेत. बिअर उत्पादकांनी आगामी उन्हाळ्यात पुरवठा विस्कळीत होण्याचा इशारा दिला असून, मद्य उत्पादक संघटनांनी राज्यांकडे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या (IMFL) किमती सुधारण्याची विनंती केली आहे.
दारू दरवाढीची मुख्य कारणे
गेल्या काही आठवड्यांत पॅकिंग मटेरियलच्या किमतीत १०-१२ टक्के वाढ झाली आहे. काचेच्या बाटल्यांच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर ॲल्युमिनियमच्या टंचाईमुळे बिअर कॅन्सच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. इंधन दरवाढीमुळे मालवाहतूक खर्च १० टक्क्यांनी महागला असून, त्याचा थेट परिणाम मद्याच्या अंतिम किमतीवर होत आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम?
'ब्र्युअर्स असोसिएशन ऑफ इंडिया'च्या मते, जागतिक संघर्षांमुळे कच्च्या मालाचा पुरवठा साखळीवर मोठा ताण आला आहे. कागदी पुठ्ठ्यांच्या किमती चक्क १०० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसेच एलएनजीच्या (LNG) तुटवड्यामुळे काचेच्या बाटल्यांचे उत्पादनही प्रभावित झाले आहे.
'कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीज' (CIABC) नुसार, रुपयाचे कमकुवत होणे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे मद्य उद्योगावर मोठा दबाव आहे. राज्यांनी जर किमती वाढवण्यास परवानगी दिली नाही, तर उत्पादकांना तोटा सहन करावा लागेल आणि बाजारात तुटवडा निर्माण होऊ शकतो.
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
जर राज्य सरकारांनी मद्य उत्पादकांची मागणी मान्य केली, तर बिअर आणि विदेशी मद्याच्या बाटलीमागे किमान ५ ते १० टक्के दरवाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बिअरची मागणी वाढते, अशा वेळी हा तुटवडा मद्यप्रेमींसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.






