Wednesday, March 25, 2026

नाशिक म्हाडाच्या २० टक्के घरकुल योजनेतील कारभाराचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

नाशिक म्हाडाच्या २० टक्के घरकुल योजनेतील कारभाराचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

 महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

दोनशेपेक्षा अधिक विकासकांवर गुन्हे

मुंबई :  नाशिक शहरात गरिबांसाठीच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारण्यासाठी विकासक आणि महसूल अधिकाऱ्यांनी संगनमताने 'कार्टेल' तयार करून मोठा घोटाळा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी २०० हून अधिक विकासकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून, या संपूर्ण प्रकरणाची एका महिन्याच्या आत उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली.

आमदार देवयानी फरांदे यांनी लक्ष्यवेधी सूचनेद्वारे नाशिकमधील म्हाडाच्या २० टक्के राखीव भूखंड प्रकरणातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे मान्य केले.

काय आहे 'प्लॉट स्प्लिटिंग' घोटाळा ?

शासनाच्या २०१३ च्या धोरणानुसार, ४००० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्राच्या लेआऊटमध्ये २० टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) म्हाडाला देणे बंधनकारक आहे. मात्र, नाशिकमध्ये विकासकांनी ही जागा द्यावी लागू नये म्हणून जमिनीचे ४००० मीटरपेक्षा कमी क्षेत्राचे लहान तुकडे पाडले. विशेष म्हणजे, जमिनीचा मालक एकच असतानाही केवळ कागदोपत्री तुकडे करून २० टक्के आरक्षणातून पळवाट काढण्यात आली. "एकाच दिवशी जमिनीचे पाच-पाच तुकडे करून मंजुरी मिळवण्याची मग्रूरी या कार्टेलने दाखवली आहे," असे मंत्री बावनकुळे यांनी यावेळी सभागृहात सांगितले.

उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी महसूलमंत्र्यांनी पाच ते सात वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती जाहीर केली आहे. यामध्ये पुणे विभागाचे विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त (पुणे), नाशिकचे पोलीस आयुक्त ( संदीप कर्णिक ), नगररचना विभागाचे संचालक (ADTP) यांचा समावेश असेल. ही समिती महिनाभरात आपला अहवाल सादर करेल.

अधिकाऱ्यांवरही होणार कठोर कारवाई

"केवळ विकासकच नव्हे, तर या प्रकरणाला खतपाणी घालणारे भूमी अभिलेख विभाग, नगररचना विभाग आणि म्हाडाचे अधिकारीही तितकेच दोषी आहेत. ज्या अधिकाऱ्यांच्या सह्यांनी हे बनावट नकाशे मंजूर झाले, त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील. गरिबांचा हक्क हिरावून घेणाऱ्या एकाही व्यक्तीला सोडले जाणार नाही," असा इशारा महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >