Wednesday, March 25, 2026

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना मोठा दिलासा; हेक्टरी २२ हजार रुपयांपर्यंत मदत देण्याचा राज्य सरकारचा मानस

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना मोठा दिलासा; हेक्टरी २२ हजार रुपयांपर्यंत मदत देण्याचा राज्य सरकारचा मानस

मुंबई: गेल्या काही दिवसांत झालेल्या अवेळी पाऊस आणि हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अत्यंत सकारात्मक पाऊल उचलले असून, फळ पीक विमा न उतरवलेल्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्री यांनी आज विधानसभेत यासंदर्भात सविस्तर माहिती देत पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे जाहीर केले.

नुकसानीचा प्राथमिक अहवाल आणि बैठक

आंबा व काजू पिकाच्या सद्यस्थितीबाबत १७ मार्च रोजी पहिली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सादर करण्यात आलेल्या प्राथमिक अहवालानुसार, प्रतिकूल हवामानामुळे यंदा फळधारणा अत्यंत कमी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील सुमारे ८० हजार शेतकऱ्यांनी आंबा पिकासाठी विमा उतरवला आहे. कोकणातील ३०२ महसूल मंडळांपैकी १५५ मंडळांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक असल्याचे समोर आले आहे.

विमा संरक्षण आणि नुकसान भरपाईचे स्वरूप

अवेळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी १५ मे पर्यंत विमा संरक्षण लागू आहे. हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत आंबा उत्पादकांसाठी प्रति हेक्टर २ लाख २७ हजार रुपये नुकसान भरपाईची तरतूद आहे. तर काजू उत्पादकांसाठी प्रति हेक्टर १ लाख ६० हजार रुपये नुकसान भरपाई मिळू शकते. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला नाही, त्यांनाही वाऱ्यावर न सोडता शासन स्तरावर आर्थिक मदत दिली जाणार आहे. गेल्या वेळी अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५ हजार रुपये देण्यात आले होते. मात्र, नुकसानीचे स्वरूप पाहता यंदा ही मदत वाढवून २२ हजार रुपये प्रति हेक्टर देण्याचा सरकारचा मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment