मुंबई: दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील हजारो रहिवाशांचे पुनर्वसनाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या भागातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी ग्वाही राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज विधानसभेत दिली. आमदार अमीन पटेल यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते.
८ हजार कुटुंबांना मिळणार हक्काची घरे
कामाठीपुरा परिसरातील सुमारे ८ हजार कुटुंबांना सुरक्षित आणि सुसज्ज घरे उपलब्ध करून देण्यासाठी १२ जानेवारी २०२३ रोजी समूह पुनर्विकासाचा (Cluster Development) निर्णय घेण्यात आला होता. यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण नियुक्त करण्यात आले असून पात्र विकासकांची निवडही पूर्ण झाली आहे. या प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेऊन याला ‘व्हायटल प्रोजेक्ट’ (अति-महत्त्वाचा प्रकल्प) म्हणून घोषित करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांच्या स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले.
उमरखाडी येथील एकूण ८१ इमारतींच्या पुनर्विकासासाठी टप्प्याटप्प्याने काम केले जाईल. पहिल्या टप्प्यात ३६ इमारतींचे काम हाती घेतले जाणार असून, १२ इमारतींच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. गरज भासल्यास अधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.






