मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील जीवनदीप अनुदानित आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. या घटनेत शाळेचा निष्काळजीपणा समोर आला असून, संबंधित संस्थेची मान्यता का रद्द करण्यात येऊ नये, याबाबत 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज विधान परिषदेत दिली.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट २०२५ रोजी या आश्रमशाळेतील विद्यार्थिनी कु. दिपाली कोमटी हिचा जिल्हा सामान्य रुग्णालय, यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर आयुक्त, आदिवासी विकास (अमरावती) यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विद्यार्थिनी आजारी असताना तिला वेळेवर योग्य उपचार मिळवून देण्यात शालेय प्रशासनाकडून गंभीर स्वरूपाचा निष्काळजीपणा झाल्याचे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
शासनाकडून कडक कारवाईचे संकेत
आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत आणि देखरेखीबाबत अनेक त्रुटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्री डॉ. उईके यांनी सभागृहात सांगितले की, संबंधित संस्थेला त्यांची मान्यता रद्द करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. तसेच, शाळेच्या दैनंदिन कामकाजात पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तिथे तात्काळ 'प्रशासक' नेमण्यात येणार आहे. पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबाला शासनाच्या वतीने २ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान आधीच वितरित करण्यात आले आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






