मुंबई : नाशिक जिल्ह्यातील अनेक दशके जुन्या असलेल्या खिर्डीसाठे, डोंगरगाव आणि खडकओझर या लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीचे काम जलसंपदा विभागाने हाती घेतले आहे. या प्रकल्पांच्या दुरुस्तीमुळे शेतीसाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या गळतीला लगाम बसणार असून, परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार पंकज भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासात या प्रकल्पांच्या दुरवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत आमदार किशोर दराडे यांनीही उपप्रश्न विचारून नाशिकमधील सिंचन सुविधांच्या सक्षमीकरणाची मागणी केली.
कालव्यांचे मजबुतीकरण आणि आस्तरीकरण
मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, खिर्डीसाठे लघु पाटबंधारे प्रकल्प हा १०० वर्षांहून अधिक जुना आहे, तर डोंगरगाव आणि खडकओझर प्रकल्प ५० ते ६० वर्षांपूर्वीचे आहेत. प्रदीर्घ काळामुळे या प्रकल्पांच्या कालव्यांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली असून पाणी गळतीचे प्रमाण वाढले होते. आता या दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत कालव्यांचे मजबुतीकरण आणि आस्तरीकरण (Lining) करण्यात येणार आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय टळून शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतकऱ्याला पाणी मिळणे सुलभ होणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
हे तलाव प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून, त्यांची साठवण क्षमता आणि वहन क्षमता वाढल्यास नाशिकमधील शेतीला मोठे बळ मिळेल. दुरुस्ती खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती तांत्रिक कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.






