Tuesday, March 24, 2026

'खरात सारख्या विकृताला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी'

'खरात सारख्या विकृताला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी'

सुनील तटकरे; बोटाला झालेली जखम लोकसभा निवडणुकीवेळची

मुंबई : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या सांगण्यावरून तंत्र-मंत्रासाठी बोटाला जखम करून घेतल्याचा आरोप फेटाळून लावत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विरोधकांचे दावे खोडून काढले आहेत. "माझ्या बोटाला झालेली जखम ही लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेली असून, खरातसारख्या विकृताला कायद्याने कठोर अद्दल घडवावी हीच आमची भूमिका आहे," अशा शब्दांत तटकरे यांनी आपली बाजू स्पष्ट केली.

अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांच्या नावाचा संबंध जोडून विरोधकांनी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे यांनी या प्रकरणावर सविस्तर भाष्य केले. आपल्या बोटाला झालेल्या जखमेचा घटनाक्रम सांगताना तटकरे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी मी अलिबाग दौऱ्यावर होतो. तिथे जिल्ह्याचे नामांकित वकील प्रवीण ठाकूर यांची भेट झाली. ते गाडीचा दरवाजा बंद करत असताना माझा अंगठा त्यात अडकला आणि मोठी जखम झाली. त्याच वेळी जवळच्या रुग्णालयात मला पाच टाके घालावे लागले होते. दिल्लीत गेल्यानंतरही ही जखम कायम होती. आता या जुन्या जखमेचा संबंध भोंदू बाबाशी जोडला जात असेल, तर ते दुर्दैवी आहे."

एसआयटीकडून सखोल तपास व्हावा

खरात प्रकरणाच्या सखोल तपासासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते या तपास पथकाचे नेतृत्व करत असून, सभागृहात यावर निवेदनही दिले जाणार आहे. खरात सारख्या विकृताला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, ही आमची भूमिका आहे”, असेही सुनील तटकरे यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >