मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीला उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र त्यानंतर तुफान गारपीट झाली. हीच गारपीट आता घाम काढणार आहे. मागच्या २४ तासांत हवामानात मोठे बदल झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तुफान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा वेळ हा ताशी ५० किमीपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबईसह कोकणात मात्र सर्वाधिक उष्णता वाढण्याची शक्यता आहे. ५ जिल्हे सर्वात हॉट असतील.
का पडतोय पाऊस?
हवामान खात्याच्या मते, सध्या देशात एक मजबूत वेस्टर्न डिस्टरबन्स आणि सायक्लोनिक सर्क्युलेशन यांचा एकत्रित परिणाम म्हणून अशी विचित्र स्थिती तयार झाली आहे. भूमध्य समुद्राकडून येणारे ओले वारे जेव्हा हिमालयाच्या भागात धडकतात, तेव्हा उत्तर भारतात पाऊस आणि बर्फवृष्टी होते.
यावेळचा हा डिस्टरबन्स खूप जास्त ताकदवान आहे. हवेच्या कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे ढगांची चक्राकार हालचाल सुरू झाली आहे. हे चक्र सध्या उत्तर आणि पूर्व भारतावर सक्रिय आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे हवेत ओलावा वाढला आहे. जेव्हा हा ओलावा गरम हवेच्या संपर्कात येतो, तेव्हा वेगाने ढग तयार होतात आणि अचानक गडगडाटासह पाऊस पडतो.
विदर्भ आणि मराठवाड्याला मोठा दिलासा
गेल्या काही दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला होता. मात्र, आता इथलं आकाश पूर्णपणे निरभ्र होणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पावसाची कोणतीही मोठी सिस्टीम आता महाराष्ट्रावर सक्रिय नाही. त्यामुळे शेतात कापणीला आलेल्या पिकांना किंवा काढून ठेवलेल्या मालाला आता पावसाचा फटका बसणार नाही.
पाऊस थांबला असला तरी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होऊ शकते. म्हणजेच, पहाटे आणि रात्री हलका गारवा जाणवेल, तर दिवसा उन्हाचा चटका वाढायला सुरुवात होईल. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरही आता आकाश स्वच्छ राहील, ज्यामुळे आर्द्रता कमी होऊन थोडा दिलासा मिळेल.
उत्तर भारतात काय स्थिती
पुढील काही दिवसांत देशाच्या वेगवेगळ्या भागांत पावसाची तीव्रता वेगवेगळी असेल. उत्तर भारतात डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि पाऊस होईल, तर पूर्व आणि दक्षिण भारतात जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट जास्त जाणवेल. महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्रात कसं राहील हवामान
कोकण आणि गोव्याचा विचार केला तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग पट्ट्यात पाऊस होणार नाही. इथे प्रचंड उष्णता वाढण्याची शक्यता आहे. ५ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने खास हिटवेवचा अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात मात्र वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज वर्तवला आहे.
सातारा, सांगली, धारशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा धोका आहे. पुण्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे. विदर्भ-मराठवाड्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर या भागात आज पावसाचा अंदाज नसला तरी पुढचे ४८ तास पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
तापमानात मोठी घट
या बदललेल्या हवामानामुळे तापमानात ४ ते ५ अंशांनी घट नोंदवली जाणार आहे. उन्हाच्या काहिलीतून लोकांना तात्पुरता दिलासा मिळेल खरा, पण हा दिलासा फार काळ टिकणारा नाही. पावसाचा हा जोर ओसरल्यानंतर पुन्हा एकदा कडाक्याचं ऊन पडण्याची शक्यता आहे. या हवामानातील अस्थिरतेमुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






