Monday, March 23, 2026

'भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात कुणालाही सोडणार नाही'

'भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात कुणालाही सोडणार नाही'

मुंबई : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन' याच्या अघोरी कृत्यांचे आणि लैंगिक शोषणाचे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर, राज्यभरात खळबळ उडाली. सोमवारी विधानसभेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले. विरोधकांनी यावर चर्चेची मागणी करत गदारोळ घातला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती करत मंगळवारी या प्रकरणावर निवेदन करणार असल्याचे सांगितले. तसेच भोंदुबाबा प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनी अशोक खरात प्रकरणात सोमवारी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, शासन यात कारवाई करत असून शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, असे आदेश दिले. मात्र, त्यानंतरही विरोधकांनी या प्रकरणावर चर्चा घडवून आणण्याची मागणी कायम ठेवत गदारोळ घातला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करीत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "विरोधी पक्षाच्या वतीने जो मुद्दा उपस्थित झाला तो अत्यंत गंभीर आहे. भोंदुबाबा अशोक खरातने आपल्या कथित शक्तींचा दुरुपयोग करत दिशाभूल करून अनेक महिलांसोबत गैरव्यवहार, दुष्कृत्य केल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी ट्रॅप तयार करून सक्रियपणे यासंदर्भातील कारवाई केली आहे. या प्रकरणात महिला समोर यायला तयार नव्हत्या. पण त्यांना योग्य पद्धतीने धीर दिल्यानंतर आता काही महिलांनी तक्रार केली असून उर्वरित अजून काही महिला तक्रार करतील." १० मार्चपासून कारवाईच्या हालचाली

"यासंदर्भात कारवाई आता झाली असली तरीसुद्धा याची तयारी आधीपासूनच सुरू होती. अशोक खरातच्या अटकेच्या अगोदर म्हणजेच दि. १० मार्च रोजी दुसऱ्या जिल्ह्यातून एका तक्रारीचा उपयोग करून त्यांचा एलओसीदेखील काढून ठेवला होता, जेणेकरून त्यांना बाहेर पळता येऊ नये. या प्रकरणात पूर्ण कारवाई सुरु असून मी या सभागृहात उद्या याचे सविस्तर निवेदन करेन. हा कोणासाठीही राजकारणाचा प्रश्न नाही तर, महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. महिलांचा दुरुपयोग करून त्यांचे ब्रेन वॉशिंग करण्यासारख्या अनेक गोष्टी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मी याबाबत सखोल निवेदन करेन," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कुणाचा दुरचा संबंध असेल तरीही सोडणार नाही

"मी नेहमी क्लिनचिट देत नाही. जो क्लिन असतो त्यालाच क्लिनचिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. या प्रकरणात ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडले जाणार नाही," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment