मुंबई इंडियन्स संघाची नजर आयपीएल २०२६ च्या हंगामात सहाव्या विजेतेपदावर आहे. मात्र यंदाचा सीझन खास ठरणार आहे, कारण संघात दोन टी-20 वर्ल्ड कप विजेते कर्णधार एकत्र खेळताना दिसणार आहेत.
सध्या हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करत असून, त्याच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे दोघेही मैदानात उतरतील. हार्दिक पंड्या २०२४ मध्ये मुंबईचा कर्णधार बनला, मात्र त्या हंगामात संघाची कामगिरी निराशाजनक ठरली आणि मुंबई शेवटच्या स्थानावर राहिली. त्यानंतर २०२५ मध्ये संघाने पुनरागमन करत प्लेऑफ गाठले, पण अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयश आले.
दरम्यान, भारताचे माजी फलंदाज श्रीकांत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते, मुंबई इंडियन्सने कर्णधारपद सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवावे.
श्रीकांत यांनी यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, “ही परिस्थिती थोडी विचित्र आहे. हार्दिक पंड्या चांगले कर्णधार आहेत, पण त्यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्ल्ड कप विजेते कर्णधार खेळत आहेत. हा संघाचा अंतर्गत निर्णय असू शकतो, पण तो त्यांनाच सोडवावा लागेल.”
ते पुढे म्हणाले की, “बाहेरून पाहता सूर्यकुमार यादव हा कर्णधारपदासाठी सर्वोत्तम पर्याय वाटतो. हार्दिकने स्वतःहून कर्णधारपद सोडून सूर्यकुमारला संधी द्यावी.”
विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवने अद्याप आयपीएलमध्ये कोणत्याही संघाचे पूर्णवेळ कर्णधारपद भूषवलेले नाही. तर हार्दिकने गुजरात टायटन्स संघाला २०२२ मध्ये त्यांच्या पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवून दिले होते.
श्रीकांत यांनी असेही मत व्यक्त केले की, “हार्दिकने रोहित आणि सूर्यकुमार यांच्या नेतृत्वाखाली भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः पुढाकार घेत सूर्यकुमारकडे कर्णधारपद सोपवावे. यामुळे संघातील परिस्थिती सहज मार्गी लागू शकते.”