Sunday, March 22, 2026

विमान प्रवास महागणार? देशांतर्गत भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा केंद्राचा निर्णय

विमान प्रवास महागणार? देशांतर्गत भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा केंद्राचा निर्णय

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यांवरील तात्पुरती मर्यादा हटवण्याचा निर्णय घेतला असून, सोमवारपासून विमान कंपन्यांना तिकीट दर स्वातंत्र्याने ठरवता येणार आहेत. वाढत्या परिचालन खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

डिसेंबर २०२५ पर्यंत लागू असलेली भाड्याची मर्यादा काही महिन्यांपूर्वीच लागू करण्यात आली होती. विमानसेवेत मोठ्या प्रमाणावर व्यत्यय आल्यामुळे तिकीट दरात अचानक वाढ झाली होती, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने ही मर्यादा घातली होती.

आता ही मर्यादा हटवल्यामुळे, विमान कंपन्यांवर असलेले कमाल भाड्याचे बंधन राहणार नाही. पूर्वी अंतरानुसार इकॉनॉमी क्लासच्या एकेरी तिकिटासाठी सुमारे १८,००० रुपयांची मर्यादा होती. मात्र, आता कंपन्या मागणी, हंगाम आणि बाजारातील परिस्थितीनुसार दर निश्चित करू शकतील.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, जास्त मागणी, आपत्कालीन परिस्थिती किंवा सेवा व्यत्ययाच्या काळात अवाजवी भाडेवाढ झाल्यास त्यावर लक्ष ठेवले जाईल. गरज भासल्यास पुन्हा भाडे नियंत्रण लागू करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, विमान इंधन (एटीएफ) दरवाढ आणि जागतिक भू-राजकीय तणावामुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे उद्योगाला काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी आणि बाजारातील स्थिती पूर्ववत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

वाढत्या आर्थिक दबावामुळे विमान कंपन्यांकडून ही मर्यादा हटवण्याची मागणी सातत्याने होत होती. Federation of Indian Airlines या उद्योग संघटनेनेही भाडे मर्यादेमुळे महसुलावर परिणाम होत असल्याचे सांगत सरकारकडे ही मर्यादा हटवण्याची मागणी केली होती.

Comments
Add Comment