Sunday, March 22, 2026

उन्हाळा येताच लिंबू महागले

उन्हाळा येताच लिंबू महागले

मुंबई : उन्हाळा येताच किरकोळ बाजारात लिंबू महागले आहे. सध्या किरकोळ बाजारात आकारमानानुसार लिंबू प्रति नग १०, १२, १५ रुपये दराने विकले जात आहे. अन्नाची लज्जत वाढवणारे, पचनक्रिया सुधारण्यास मदत करणारे, शरीराची क जीवनसत्त्वाची (व्हिटॅमिन सी) गरज भागवणारे, उन्हाळ्यात सरबताच्या रुपात तहान भागविणारे लिंबू महागले आहे. यामुळे एरवी बाजारात आल्यास हमखास लिंबू खरेदी करणारे ग्राहक आता हात आखडता घेऊ लागले आहेत.

महाराष्ट्रात प्रामुख्याने अहिल्यानगरमधील श्रीगोंदे तसेच सोलापूर, जळगाव, बुलढाणा आणि अकोल्याच्या काही भागांतून मोठ्या प्रमाणात लिंबांचा पुरवठा होतो. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधूनही राज्यात लिंबाची आवक होते. पण राज्यातले लिंबाचे आगार म्हणून श्रीगोंद्याचीच ओळख आहे. मात्र सध्या लिंबाच्या व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

उत्पादकांकडून दलाल प्रतिकिलो ८० ते ८५ रुपये दराने लिंबाची खरेदी करत आहेत. एका किलोत साधारण २५ ते ३० लिंब दलाल घेत आहेत. हे दलाल मुंबई - पुण्यातील घाऊक व्यापाऱ्यांना प्रतिकिलो १५० रुपये दराने लिंबांची विक्री करत आहेत. घाऊक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यापारी लिंब खरेदी करून ती ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत. उत्पादक, दलाल, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी ते ग्राहक अशी ही साखळी आहे. या साखळीत दलालापासून ते किरकोळ व्यापाऱ्यापर्यंतचे सगळे नफा कमावत आहेत. यामुळेच ग्राहकाला लिंबू दहा ते पंधरा रुपये प्रति नग या दराने उपलब्ध आहे. एरवी दहा रुपयांत किमान दोन ते तीन लिंबू उपलब्ध असतात. पण सध्या दहा ते पंधरा रुपयांत एक मध्यम आकाराचे लिंबू मिळत आहे.

Comments
Add Comment