मुंबई : “आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक आहे. तांत्रिक ज्ञानासोबतच सॉफ्ट स्किल्स आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता असणे, ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते. उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांनी रतन टाटा यांचा आदर्श ठेवावा. नफा मिळवण्यासोबतच सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी, याचे टाटा हे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही समाजाची, राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती असते”, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी शनिवारी केले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा लोकभवन येथील दरबार हॉल येथे पार पडला, त्यावेळी या कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले, उद्योगांच्या मागणीनुसार अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ग्रीन एनर्जी आणि डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश करून विद्यार्थ्यांना जागतिक आव्हानांसाठी तयार केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनला असून, आता तिसऱ्या क्रमांकाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ही प्रगती साधताना तरुणांनी 'स्किल इंडिया' आणि 'पीएम-दक्ष' सारख्या व्यासपीठांचा लाभ घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.
विद्यापीठांनी नाविन्यता, प्रयोगशीलता जपावी - राज्यपाल
राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, आधुनिक विद्यापीठांनी नाविन्यता, प्रयोगशीलता जोपासली पाहिजे. शिक्षणामुळे शाश्वत प्रगतीकडे जाण्यासाठी चारित्र्य आणि जबाबदारीची जाणीवही निर्माण झाली पाहिजे. मध्यपूर्वेतील संघर्षांसह सध्याच्या भू-राजकीय घडामोडींचा जागतिक अर्थव्यवस्था आणि उपजीविकेवर आधीच परिणाम होत आहे, ज्यामुळे अनेक नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण आणि संबंधित कौशल्ये आत्मसात करण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
कुशल मनुष्यबळ ही काळाची गरज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ तरुण लोकसंख्या असून चालत नाही, तर त्या लोकसंख्येला कौशल्याची जोड असेल तरच तो देशाचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश (डेमोग्राफिक डिविडंड) तयार होतो. पूर्वी भांडवल महत्त्वाचे होते, पण आता गुंतवणूकदार तिथेच जातात जिथे कुशल 'मानव संसाधन' उपलब्ध आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता हे आव्हान पेलण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे गरजेचे आहे. काळानुरूप मानव संसाधन तयार करावे लागेल. उद्योगांच्या गरजेनुसार दिवसागणिक कौशल्य प्रशिक्षणात बदल करावे लागतील. आज रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ 'एआय लिविंग लॅब' सारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग जगातील समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, ही अभिनंदनीय बाब आहे, असेही ते म्हणाले.