Saturday, March 21, 2026

भोंदूबाबा अशोक खरातवर उबाठाची 'कृपादृष्टी'!

भोंदूबाबा अशोक खरातवर उबाठाची 'कृपादृष्टी'!

शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी वळवले 'कॅप्टन'च्या संस्थेला; ३१ जुलै २०२० रोजी काढला जीआर

मुंबई : नाशिकच्या आध्यात्मिक आणि राजकीय वर्तुळात धुमाकूळ घालणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' याच्या पापकर्माचा घडा आता फुटू लागला आहे. या प्रकरणी विरोधक सरकारला लक्ष्य करीत असले, तरी खुद्द उबाठाच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या भोंदूवर मेहरबानी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी पळवून या बाबाच्या खासगी संस्थानाला बहाल करण्याचा प्रताप मविआ काळात करण्यात आला.

अशोक खरात हा एका रात्रीत मोठे झालेले प्रस्थ नाही. सत्तेच्या ऊबेखाली आणि राजकीय वरदहस्ताने त्याने आपले जाळे विणले होते. 'श्री शिवनिका संस्थान' या आपल्या खासगी संस्थानाला नावारूपाला आणण्यासाठी त्याने तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांशी जवळीक साधली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील या संस्थानासाठी चक्क दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्याचा अजब फतवा दि. ३१ जुलै २०२० रोजी काढण्यात आला होता.

ज्या वेळी राज्य कोरोनाच्या संकटाशी झुंजत होते आणि बळीराजा पाण्याची प्रतीक्षा करत होता, त्याच काळात ठाकरे सरकारने खरातच्या संस्थानासाठी ३९ लाख लिटर पाणी आरक्षित करण्याचा शासन निर्णय (जीआर) काढला. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या दारणा धरणातील पाणी एका भोंदूच्या संस्थानासाठी वळवणे, हा शेतकऱ्यांशी केलेला द्रोह असल्याची संतप्त भावना आता जनमानसात उमटत आहे.

दारणा धरणातून अशोक खरातच्या शिवालीक संस्थेला पाणी सोडण्याचा जीआर आम्ही तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे. हा जीआर कोणी काढला, नोटिंगवर कोणाच्या सह्या होत्या याची चौकशी केली जाईल. - राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री
Comments
Add Comment