फेब्रुवारी ते जूनदरम्यान मुंबईच्या फळ मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या विक्रीला मोठी गती मिळत असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल झाली. रत्नागिरी व देवगड हापूसची आवक अवकाळी पाऊस आणि कीड हल्ल्यांमुळे घटली असून त्यामुळे दर गगनाला भिडले आहेत. आखाती युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्याने यंदा स्थानिक बाजारात हापूस आंबा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे.
फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांच्या कालावधीत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमधील उलाढालीला कमालीची गती मिळालेली असते. फळ मार्केटमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यांतून तसेच परराज्यातूनही फळे विक्रीला येत असतात. या मार्केटमध्ये देशाच्या अनेक राज्यांतून आंबे विक्रीला येत असले तरी कोकणचा हापूस हा आंबा खवय्यांच्या पसंतीचा असतो. वर्षभर वाट पाहिलं, पण खाल्ला तर हापूसच खाईन, असे आंबाप्रेमी अभिमानाने सांगत असतात. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, राम नवमी व अन्य सणांना घराघरांमध्ये हापूस आंब्याच्या रसाचा कार्यक्रम ठरलेलाच असतो. त्यामुळे अन्य दिवसांच्या तुलनेत या दिवसांसाठी आंबा विक्रीच्या उलाढालीचा आलेख कमालीचा उंचावलेला असतो. कोकणच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा तीन जिल्ह्यांतून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल येथील नागरिकांसाठी आंबा विक्रीला येत असला तरी रायगडच्या तुलनेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसला अधिक मागणी असते व चवीचा दर्जाही काही वेगळाच असतो. भाज्या आणि फळभाज्या मार्केटमध्ये विक्रीला शेतकऱ्यांकडून थेट येत असतात. हापूस आंब्याचे गणित त्या तुलनेत वेगळे असते. मार्केटमध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आंबा थेट विक्रीला पाठविण्याचे प्रमाण नगण्य असते. मार्केटमधील व्यापारीच कोकणात जाऊन थेट बागांचाच सौदा करत असल्याने फळांचे पैसे शेतकऱ्याला जागेवरच उपलब्ध होत असतात. गुढीपाडव्याच्या दिनी मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल आंबा विक्रीतून झालेली आहे. खवय्यांची आंब्याला असलेली पसंती पाहून अन्य राज्यातील आंबा उत्पादक महाराष्ट्रातील शहरी भागातील मार्केटमध्ये आंबा विक्रीला पाठवत असतात. कोकणच्या हापूसच्या खालोखाल कर्नाटकच्या आंब्याने मार्केट व्यापलेले असते. एपीएमसी मार्केटमधील प्रत्येक विंगमधील गाळ्यागाळ्यावर हापूस आंब्यांनी जागा व्यापलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून रत्नागिरी, लांजा, राजापूर भागातून तर सिंधुदुर्गचा देवगड हापूस विक्रीला आला आहे. रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागातूनही हापूस आंबा विक्रीला आला आहे. जानेवारी महिन्यापासूनच हापूस आंब्याची मार्केटला तुरळक आवक येण्यास सुरुवात होते, एप्रिलच्या मध्यापासून हापूस आंब्याची आवक वाढून दररोज लाखांच्या संख्येने हापूस आंब्याच्या पेट्या मार्केटमध्ये विक्रीला येत असतात. आवक वाढल्यावर याच कालावधीत हापूस आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतात. मार्केटमध्ये कोकणच्या हापूस आंब्याव्यतिरिक्त केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही काही प्रमाणात ‘हापूस’ सदृश आंबा विक्रीसाठी येत असतो. दरवर्षीच्या तुलनेत हापूस आंब्याची आवक कमी झालेली आहे. फुलोऱ्याच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि कीड हल्ल्यांमुळे आंब्याच्या काढणीला विलंब झाला असून, रत्नागिरी आणि देवगड हापूसची आवक घटली आहे आणि शहरभरातील हंगामाच्या सुरुवातीच्या पुरवठ्याचे स्वरूप बदलले आहे. आंबा आवकच मंदावल्याने किमती गगनभरारी घेत आहेत. हापूसचे दर ५ ते ९ डझनाच्या पेटीचे २ ते ८ हजार रुपये आहेत. आखाती युद्ध सुरू असल्याने हापूस आंब्याची हक्काची बाजारपेठ ओळखली जाणाऱ्या आखाती देशांमध्ये हापूसची निर्यात अजून सुरू झालेली नाही व युद्धामुळे लवकर निर्यात होण्याची शक्यताही नाही. त्यामुळे स्थानिक बाजारातील मार्केटमध्ये आंबा विकला जाणार असल्याने यंदा खवय्यांना आंबा मुबलक प्रमाणावर उपलब्ध होणार आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई शहर व उपनगरामध्ये जवळपास ३२ कोटी ५० लाख रुपयांच्या आंब्याची विक्री झाली आहे. यामध्ये १० कोटी रुपयांच्या कर्नाटक आंब्याची, तर उर्वरित २२ कोटी ५० लाख रुपयांच्या कोकणमधून आलेल्या हापूस आंब्याची विक्री झालेली आहे. युरोपीय देशांमधून हापूस आंब्याला फारशी मागणी नसल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आखाती देशांमधील बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागत आहे. आखाती युद्धामुळे रमजानचा महिना असतानाही अन्य फळांची विक्री न झाल्याने फळ उत्पादकांना यंदा प्रचंड फटका बसला आहे. इराण आपला फळांचा मुख्य ग्राहक असून कलिंगड, डाळिंबसह अन्य भारतीय फळांना रमजानच्या महिन्यात इराणमधून सर्वांधिक मागणी असते. त्याखालोखाल अन्य आखाती देशांतून विशेषत: दुबईतून अधिक मागणी असते. सध्या आखाती युद्ध सुरू असल्याने निर्यातदार व्यापाऱ्यांचे नुकसान प्रचंड झाले आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या बागा विकत घेऊन त्यातील आंबे आता स्थानिक बाजारांमध्ये विकण्याची वेळ आलेली आहे. हापूसला असलेली मागणी व मिळणारा दर पाहून देशातील अन्य आंबा हापूसच्या नावाखाली विकण्याचा प्रकारही काही ठिकाणी होत असतो. खऱ्या खवय्यांना हापूस आंबा लगेच ओळखता येतो आणि इतरांच्या नशिबी फसगत येते. कोकणचा हापूस हा रंगावरून नाही तर गंधावरून ओळखता येतो. त्यामुळेच हापूस घेताना आधी वास घ्या, रंग पाहू नका. खऱ्या कोकण हापूसला एक तीव्र, नैसर्गिक सुगंध असतो जो दुरूनही जाणवतो, अशी माहिती आंबा खवय्यांकडून देण्यात येते. पिकल्यावर हापूस आंबे गडद केशरी-पिवळे असतात. ते कधीही निस्तेज किंवा डागाळलेले नसतात. आंब्याची पातळ, नाजूक त्वचा जी स्पर्शाला मऊ आणि मुलायम वाटते. हापूसच्या नावाखाली स्थानिक बाजारामध्ये अधिक नफा कमविण्यासाठी अन्य जातीचे आंबे बनावट हापूस म्हणून विकण्याचा प्रकार घडत असतो. जाड साल, अधिक टणकपणा, अधिक तंतुमय पोत आणि लक्षणीयरीत्या कमी सुगंध ही अल्फोन्सो नावाने विकल्या जाणाऱ्या दक्षिणेकडील जातींची वैशिष्ट्ये आहेत. एपीएमसी मार्केट, दादर मार्केट, क्रॉफर्ड मार्केट आणि मुंबई शहर व उपनगरातील आंबा व्यापारी ग्राहकांची आंबा मागणी पूर्ण करण्यासाठी दक्षिणेकडील आंब्यांच्या जातीचा साठा करत आहेत, तर दुसरीकडे अस्सल देवगड हापूस दुर्मीळ, महागडा असून खरेदीदारांना तो ओळखणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. फुलोऱ्याच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि कीड हल्ल्यांमुळे काढणीला विलंब झाला असून, रत्नागिरी आणि देवगड हापूसची आवक घटली आहे. आंबा उत्पादनात घट झालेली असतानाही सुरू असलेल्या आखाती युद्धामुळे स्थानिक बाजारांमध्ये हापूस आंबा विक्रीसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे.