Friday, March 20, 2026

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन

मुंबई : "माणसाला मानवतेची जाणीव करून देणारा चवदार तळ्याचा सत्याग्रह हा भारताच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण होता. ज्या विषमतेने आणि अनिष्ठ प्रथांनी विखंडित समाज निर्माण केला, त्याच व्यवस्थेमुळे देशाला शेकडो वर्षे गुलामगिरी सोसावी लागली. मुळात अस्पृश्यता आणि विषमता हा सर्वात मोठा अपराध असून, भावी पिढीला समतेचे मूल्य आणि विषमतेमुळे झालेले नुकसान या दोन्ही गोष्टी समजणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथे केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित शताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चवदार तळे जलशुद्धीकरण आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, उद्योगमंत्री उदय सामंत, भरत गोगावले, आमदार प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.

ऐतिहासिक संदर्भांचा दाखला देत मुख्यमंत्री म्हणाले की, "३ एप्रिल १९२७ च्या 'बहिष्कृत भारत'मध्ये बाबासाहेबांनी या आंदोलनाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली होती. ज्याप्रमाणे त्या क्रांतीने जगाचा इतिहास बदलला, त्याचप्रमाणे या सत्याग्रहाने भारताचे भविष्य बदलले. आपण वारंवार गुलाम का झालो, याचा विचार केला तर त्या मुळाशी आपल्या समाजातील जातीभेद आणि अस्पृश्यतेसारख्या कुप्रथा होत्या. असा विखंडित समाज नेहमीच पराभूत होतो. जर या प्रथा नसत्या, तर भारत कधीच गुलाम झाला नसता."

सर्वांगीण विकासाचा आराखडा :

या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकार चवदार तळ्याच्या जतन आणि संवर्धनासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. केवळ जलशुद्धीकरणच नव्हे, तर या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकारने विशेष आराखडा तयार केला आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी समतेचा मंत्र दिला, त्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हे सुशोभीकरण केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment