- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कतार, फ्रान्स, जॉर्डन, ओमान आणि मलेशिया या देशांच्या नेत्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा करत परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.
या संवादांदरम्यान मोदी यांनी ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध नोंदवला आणि तणाव कमी करण्यासाठी संवाद व राजनैतिक मार्गाचाच अवलंब करण्यावर भर दिला. तसेच, होर्मुझ सामुद्रधुनीत सुरक्षित आणि मुक्त जलवाहतुकीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कतारचे अमीर, जॉर्डनचे राजा आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांच्याशी बोलताना मोदी यांनी शांतता आणि स्थैर्य पुनर्स्थापित करण्यासाठी सहकार्याची गरज व्यक्त केली.
ओमानचे सुलतान आणि मलेशियाचे पंतप्रधान यांच्याशीही त्यांनी संवाद साधत तणाव कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.
या चर्चांमधून भारताने पुन्हा एकदा शांतता, सुरक्षितता आणि जागतिक स्थैर्यासाठी आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे.






