खेड : रत्नागिरी - दादर या पॅसेंजर गाडीला मागील काही महिन्यांपासून दादर ऐवजी दिवा हाच शेवटचा थांबा देण्यात आला आहे. यामुळे कोकणातून मुंबईत येणाऱ्या असंख्य प्रवाशांचे हाल होत आहेत. यावर उपाय म्हणून रत्नागिरी - दादर या पॅसेंजर गाडीला दादर येथे थांबा द्यावा, अशी मागणी भाजपच्या वैभव खेडेकर यांनी केली आहे. पॅसेंजर गाडीच्या बदललेल्या वेळा आणि दादर ऐवजी दिवा हाच शेवटचा थांबा देण्याचा निर्णय यामुळे कोकणवासियांची प्रचंड गैरसोय झाली आहे. प्रवाशांचे प्रश्न समजून घेऊन रेल्वेने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खेडेकर यांनी केली.
मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या दूरदृष्टीतून कोकणातील दुर्गम भागात रेल्वेचे स्वप्न साकार झाले. कठीण भौगोलिक परिस्थितीत उभारलेली ही रेल्वे कोकणवासीयांसाठी विकासाची नवी दिशा घेऊन आली. या प्रकल्पासाठी स्थानिकांनी आपल्या जमिनी अत्यल्प दरात दिल्या, ज्यामुळे हा ऐतिहासिक प्रकल्प शक्य झाला.
एकेकाळी केवळ ३५ रुपयांत कोकणातून मुंबईत पोहोचणे शक्य होते. कोकण रेल्वेच्या १९९४ साली सुरू झालेल्या खेड - दादर आणि रत्नागिरी - दादर या दोन्ही पॅसेंजर गाड्यांनी कोकणवासीयांसाठी मोठा दिलासा होती. मात्र, सध्या दादर स्थानकावरील कोकण रेल्वेचा थांबा काढण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याऐवजी गोरखपूरकडे जाणाऱ्या गाड्यांना प्राधान्य दिल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून वस्तुस्थिती समजावून सांगणे आवश्यक असल्याचे खेडेकर म्हणाले.