ठाणे : डोंबिवली आणि ठाकुर्ली या दोन स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. कल्याण-डोंबिवलीकडून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. गाड्या ३५ ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या. तंत्रज्ञांनी बिघाड दुरुस्त केला आहे. रेल्वे वाहतूक हळू हळू पूर्वपदावर येत आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार मध्य रेल्वेवरून दररोज सुमारे ६२ लाख प्रवासी प्रवास करतात. सकाळी सहा ते दुपारी बारा तसेच संध्याकाळी सहा ते रात्री बारा या बारा तासांमध्ये मध्य रेल्वेचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ऐन गर्दीच्या वेळेत वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.