मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे अमरावती, नागपूरमधील पेपर फुटीचे प्रकरण चर्चेत असतानाच सांगोल्यामध्ये प्रश्नपत्रिका चोरल्याची घटना घडली होती. सांगोला विद्यामंदिर येथील स्ट्रॉंग रूमचे कुलूप तोडून ५० प्रश्नपत्रिका पळवल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी आता सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली असून विद्यार्थ्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली आहे.
विद्यार्थ्यानेच प्रश्नपत्रिका पळवली
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगोला येथून दहावी बोर्डाची भूगोलाची प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची घटना घडली. यानंतर या संपूर्ण प्रकाराची पोलिसांनी सखोल चौकशी करत तपास केला. यामध्ये भूगोलाचा पेपर झाल्यानंतर एका इलेक्ट्रिक बाइकवरून आलेल्या दहावीत शिकणाऱ्याच मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यानंतर या मुलाने आपणच पेपर चोरला असल्याची कबुली दिली आहे.
महत्त्वाचे म्हणजे सगळे पेपर सोपे गेले भूगोलाचा अभ्यास झाला नाही. म्हणून चोरीची घटना घडली असल्याचा अनुमान सांगोल्यात लावला जात आहे. या चोरी प्रकरणात अल्पवयीन मुलाने वापरलेली इलेक्ट्रिक दुचाकी तसेच चोरलेली प्रश्नपत्रिका पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या धक्कादायक प्रकाराने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे.






