मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय २०२५-२६ हंगामासाठी क्रिकेटपटूंच्या वार्षिक करार आणि मानधन रचनेत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआयकडून ‘A+’ ही सर्वोच्च श्रेणीच रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०२४-२५ हंगामात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या चार खेळाडूंचा ‘A+’ श्रेणीत समावेश होता. या श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक ७ कोटी रुपये मानधन दिले जात होते.
या ‘A+’ श्रेणीसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने खेळणे आणि किमान एका फॉरमॅटमध्ये अव्वल १० मध्ये स्थान मिळवणे आवश्यक होते. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहली आता मर्यादित फॉरमॅटमध्येच खेळत आहेत, तर रवींद्र जडेजाने देखील टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या निकषांनुसार आता जसप्रीत बुमराह हा एकमेव पात्र खेळाडू उरला होता. यामुळेच BCCIने ‘A+’ ही श्रेणीच पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.
या निर्णयामुळे बुमराह आणि जडेजा यांना ‘A+’ वरून ‘A’ श्रेणीत घसरवण्यात आले असून, आता त्यांना ७ कोटींऐवजी ५ कोटी रुपये मानधन मिळणार आहे. मात्र, बुमराहच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा विचार करून BCCI त्याचे मानधन अचानक कमी होऊ नये, यासाठी पर्याय शोधत असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय, इतर काही खेळाडूंच्या करारमूल्यातही बदल होण्याची शक्यता आहे. भारताचा टी-२० उपकर्णधार अक्षर पटेल याच्या मानधनात वाढ होऊ शकते. तो व्हाईट-बॉल संघाचा महत्त्वाचा भाग असूनही सध्या ‘C’ श्रेणीत आहे, जिथे त्याला १ कोटी रुपये मिळतात.
एकूणच, कामगिरीनुसार न्याय्य मानधन देण्याच्या उद्देशाने BCCI करार व्यवस्थेत मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.