मुंबई: गेटवे ऑफ इंडिया येथील पर्यटकांची वाढती गर्दी आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी 'रेडिओ क्लब जेट्टी' विकसित करण्यात येत आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि शिस्तबद्ध सुविधा देण्यास आमचे प्राधान्य आहे, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
शिवसेना आमदार अशोक पाटील यांनी गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टी क्रमांक ५ आणि रॉयल बॉम्बे यॉट क्लबला दिलेल्या परवानगीबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना राणे बोलत होते.गेटवे ऑफ इंडिया हा परिसर नौदलाच्या 'हाय सिक्युरिटी झोन'मध्ये येतो. जेट्टी क्रमांक ५ वर होणारी अनियंत्रित गर्दी अपघातांना निमंत्रण देणारी ठरत होती. त्यामुळे मुंबई पोर्ट प्राधिकरणाने सुरक्षेच्या कारणास्तव येथे तरंगता तराफा (फ्लोटिंग पॉन्टून) उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार पाटील यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टला १७ टक्के आणि खासगी संस्थेला मिळणाऱ्या ८३ टक्के दराबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर स्पष्टीकरण देताना मंत्री राणे म्हणाले की, "दर ठरवण्याचे अधिकार मुंबई पोर्ट ट्रस्टकडे आहेत. तरीही, मुंबईचे मूळ भूमीपुत्र असलेल्या कोळी बांधवांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मी स्वतः केंद्रीय शिपिंग मंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिले असून, स्थानिकांना सवलती देण्यापेक्षा त्यांना आधुनिक बोटी उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे."
दरम्यान, आमदार अशोक पाटील यांनी यावेळी गेटवे ऑफ इंडिया येथील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मंत्री नितेश राणे म्हणाले, हे अतिक्रमण नसून, ती छोट्या कंटेनरमधील एक पोलीस चौकी आहे. ती गरजेची आहे. पण, यावर लोकांची अडचण होत असेल, तर त्याबाबत पर्यायी व्यवस्था करण्याबाबत सूचना केली जाईल.
वरुण सरदेसाईंना मावस भावसह निमंत्रण
आमदार वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न उपस्थित केला की, या ५ नंबरच्या जेट्टीवर जर अतिरिक्त दर आकारले जात असतील, तर त्या दर्जाची सुविधा दिली जाते का? त्याला उत्तर देताना मंत्री नितेश राणे म्हणाले, "अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी आम्ही रेडिओ क्लब जेट्टी उभारत आहोत. स्वीडनवरून 'कँडेला' नावाची अत्याधुनिक बोट लवकरच मुंबईत येत आहे. ती आली की माझा पहिला फोन वरुण सरदेसाईंना असेल. तुम्ही माझ्यासोबत त्या बोटीने फिरायला या. वाटल्यास सोबत तुमच्या 'मावस भावाला' (आदित्य ठाकरे) देखील घेऊन या. तुम्हाला 'मातोश्री'चा कोणताही त्रास होणार नाही, याची पूर्ण खबरदारी मी घेईन," असा खोचक टोला राणे यांनी लगावला. राणे यांच्या या विधानामुळे सभागृहात एकच हशा पिकला.






