मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड पर्यंतविस्तारित पुलाच्या कामाचा खर्च तब्बल ४० कोटींनी वाढला गेला. आतापर्यंत या विस्तारित पुलाच्या वाढीव खर्च तीन वेळा वाढवला गेला आहे. २०९ कोटी रुपयांवरून या प्रकल्पाचा खर्च २४८ कोटी रुपयांवर पोहोचला गेला आहे. मात्र, या वाढीव कामांबाबत कंत्राटदार आणि सल्लागारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याने आता अखेर स्थायी समितीच्यावतीने या विस्तारीत पुलाची प्रत्यक्षात जावून पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि सल्लागार कंपनी यांनाच पाचारण करून स्थायी समितीचे सदस्य हे त्यांची शाळा घेणार आहे.
गोरेगाव पूर्व येथील मृणालताई गोरे उड्डाणपूलाच्या विस्तारीत बांधकामातील कंत्राट कामांच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मागील चर्चेला आला असता शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी जुना आणि नवीन पुलाच्या बांधकामाचा हा प्रस्ताव असून जुना पूल वापरात नाही, त्यामुळे याचा खुलासा करावा अशी मागणी केली. तर हे काम आठ वर्षांपसाून सुरु आहे. अंधेरी ते गोरेगाव जाण्यासाठी अर्धा ते पाऊणतासाचा वेळ जात आहे. त्यामुळे याचे जर तीन वेळा व्हेरिएशन येत असेल तर याची प्रत्यक्ष जागी जावून पाहणी करावी अशी मागणी यशोधर फणसे यांनी केली.
तर भाजपच्या प्रिती सातम यांनी कंत्राट कामाच्या वाढीव खर्चाला दिलेल्या कारणावर आक्षेप नोंदवला. जागेची उपलब्धता आणि कार्यपध्दतीमुळे हा खर्च वाढल्याचे कारण देण्यात आले. त्यामुळे सल्लागार डोळे बंद करून आराखडा बनवतात का असा सवाल करून कंत्राटदारांच्या वाढीव खर्चावर सल्लागारांना वाढीव शुल्क देण्यात येवू नये, सल्लागारांना मुळ कंत्राट कामाचेच शुल्क देण्यात यावे अशी सूचना केली. शिवसेना महापालिका गटनेते अमेय घोले यांनीही याची प्रत्यक्ष पाहणीची मागणी केली, तर अश्रफ आझमी यांनी सल्लागारांच्या माध्यमातून अभियंत्यांमधील कौशल्य डॅमेज केले जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे अखेर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव राखून ठेवत याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल असे जाहीर केले.
महापालिकेतील रावसाहेब आणि भाऊसाहेब
महापालिकेत अधिकारी आणि सल्लागारांचा उल्लेख रावसाहेब आणि भाऊसाहेब असा करत सभागृहनेते गणेश खणकर यांनी पुलाच्या विस्तारीत कामाची पाहणी दरम्यान या रावसाहेब आणि भाऊसाहेबांनाच तिथे बोलावले जावे,अशी सूचना केली. त्यामुळे कंत्राटदाराला तिथे न बोलावता रावसाहेब आणि भाऊसाहेबांना तिथे बोलावतून त्यांच्याकडून या वाढीव खर्चाची कारणे जाणून घेतली जावीत अशी सूचना केली.






