मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख रस्ते आणि रहदारीचे मार्ग समतल करावेत. विशेषतः पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करून ते अधिक सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी सक्षम करावेत, अशी मागणी उप महापौर संजय घाडी यांनी केली आहे.
मुंबई महानगरातील रस्ते अधिक सुरक्षित, समतल व वाहतुकीसाठी सुकर व्हावेत या उद्देशाने उप महापौर संजय घाडी यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात घाडी यांनी महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई देशातील आर्थिक, औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे महानगर आहे. मुंबई महानगरपालिका हद्दीतून जाणारा पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, विविध ठिकाणचे मुख्य रस्ते, रहदारीचे रस्ते आदींवर खड्डे उद्भवले होते. पश्चिम द्रुतगती महामार्ग तसेच काही उड्डाणपुलांच्या परिरक्षणाची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित नव्हती. दोन वर्षापूर्वी पश्चिम द्रुतगती महामार्ग व उड्डाणपुलांच्या देखभालीचे जबाबदारी मुंबई महानगरपालिकेकडे सोपविण्यात आली.
त्यानंतर, महानगरपालिकेच्यावतीने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांचा भाग उंच - सखल झाला आहे. वाहनचालक, पादचारी तसेच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गैरसोय होत आहे. वाहतूक कोंडीला देखील सामाेरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग व अन्य रस्ते समतल करावेत, अशी मागणी उपमहापौर संजय घाडी यांनी केली आहे. वाहनचालक आणि नागरिकांना अधिक सुरक्षित, सोयीस्कर व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी महानगरपालिका कटीबद्ध असल्याचा विश्वासदेखील घाडी यांनी व्यक्त केला आहे.






