- जितेंद्र आव्हाडांना कठोर किंमत मोजावी लागेल
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाबाबत केलेले विधान हे अनावधानाने आलेले नसून, ते पूर्णपणे जाणीवपूर्वक केलेले आहे. या निंदनीय कृत्यासाठी त्यांना कठोर किंमत मोजावी लागेल, असा इशारा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
धर्मस्वातंत्र्य विधेयकावरील चर्चेदरम्यान आव्हाडांनी ऐतिहासिक संदर्भांचा विपर्यास करत शिवरायांचा अपमान केला. यावर भाष्य करताना देसाई म्हणाले की, "मी स्वतः सभागृहात उपस्थित होतो. आव्हाडांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून ते दिलगीर असल्याचे कोठेही जाणवत नव्हते. उलट, अध्यक्षांनी तीन वेळा निर्देश देऊनही ते मोबाईलमध्ये व्यस्त होते. त्यांना आपल्या वक्तव्याचे कोणतेही गांभीर्य नव्हते."
सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतरही आव्हाड माफी मागण्यास तयार नव्हते, असे देसाई यांनी सांगितले. "आमची सर्वांची इच्छा त्यांना निलंबित करण्याचीच होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी त्यांना कठोर शब्दांत समज देऊन माफी मागण्याचे निर्देश दिले. अखेर कारवाईच्या भीतीने त्यांनी शब्द मागे घेतले," असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा राजकीय नव्हे!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून होत असलेल्या चर्चेलाही शंभूराज देसाई यांनी पूर्णविराम दिला. "संसदेचे अधिवेशन सुरू असताना शिवसेना खासदारांच्या बैठकीसाठी आणि राज्यातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत. जिल्हा परिषद निवडीसारख्या स्थानिक प्रश्नांसाठी दिल्लीला जाण्याची त्यांना गरज नाही," असे त्यांनी सांगितले.
महायुतीचा अहवाल तयार :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आद्यप झालेली नाही. राज्यभरात ज्या ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवली गेली नाही, त्या ठिकाणांचा रिपोर्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात आलेला आहे. उदय सामंत, मी, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ या समितीमध्ये आहे. मित्रपक्षांबद्दल समन्वय समितीमध्ये चर्चा करू, असेही देसाई यांनी सांगितले.






