- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी
पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा कठोर शब्दांत निषेध करत तिला अमानवीय आणि निंदनीय म्हटले आहे, तसेच दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे. या हवाई हल्ल्यात सुमारे ४०० जणांचा मृत्यू झाला तर २५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत म्हटले, “या गुन्हेगारी कृत्याच्या दोषींना आंतरराष्ट्रीय समुदायाने जबाबदार धरले पाहिजे आणि अफगाणिस्तानमध्ये निरपराध नागरिकांना मनमानी पद्धतीने लक्ष्य करण्याचे प्रकार तात्काळ थांबवले पाहिजेत. भारत शोकाकुल कुटुंबीयांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो, जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो आणि या दुःखद प्रसंगी अफगाणिस्तानच्या जनतेसोबत एकजुटीने उभा आहे. तसेच, अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेबाबत आमचा ठाम पाठिंबा पुन्हा अधोरेखित करतो.”
परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले की, “रुग्णालयावर पाकिस्तानने केलेल्या या निर्दयी हवाई हल्ल्याचा भारत तीव्र निषेध करतो. या भ्याड हल्ल्यात मोठ्या संख्येने निरपराध लोकांचा बळी गेला आहे. पाकिस्तान हा नरसंहार लष्करी कारवाईच्या नावाखाली लपवण्याचा प्रयत्न करत आहे.”“पाकिस्तानची ही आक्रमक कारवाई अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे तसेच प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याचे गंभीर उल्लंघन आहे. आपल्या अंतर्गत अपयशांपासून लक्ष विचलित करण्यासाठी सीमा ओलांडून हल्ले करणे ही पाकिस्तानची आणखी एक खालची पातळीची कृती आहे. हा हल्ला रमजानच्या पवित्र महिन्यात करण्यात आला, जो संपूर्ण मुस्लिम समुदायासाठी शांतता आणि करुणेचे प्रतीक आहे. कोणताही धर्म, श्रद्धा किंवा कायदा रुग्णालय आणि रुग्णांवरील हल्ल्याचे समर्थन करू शकत नाही.”
अफगाण तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये सांगितले की, सोमवारी संध्याकाळी काबुलमधील एका व्यसनमुक्ती रुग्णालयावर झालेल्या हवाई हल्ल्यात सुमारे ४०० लोकांचा मृत्यू झाला असून २५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान पाकिस्तानने या आरोपांना फेटाळून लावत म्हटले आहे की, हे हल्ले दहशतवादी तळ आणि दहशतवादी पायाभूत सुविधांवर करण्यात आले होते आणि सामान्य नागरिकांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले नव्हते.






