नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत इराण-इस्रायल तणाव, देशांतर्गत परिस्थिती तसेच महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांवर विचारविनिमय झाला.
युद्धजन्य परिस्थितीत ‘एनडीए’चा घटक पक्ष म्हणून शिवसेना पंतप्रधानांच्या भूमिकेसोबत ठामपणे उभी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. “देश प्रथम” हीच भूमिका कायम ठेवत आम्ही केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात खोटा प्रचार करून राजकारण करणे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. काही नेते पाकिस्तानमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी वक्तव्य करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
युद्धस्थितीमुळे आखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणल्याची माहिती शिंदे यांनी पंतप्रधानांना दिली. तसेच होर्मुज सामुद्रधुनीतून भारताची तेलवाहतूक सुरक्षितपणे पार पडण्यासाठी केंद्राने केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी आभार मानले.
राज्यातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. गॅस टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर त्यांनी विरोधकांना धारेवर धरत राज्यात कुठेही टंचाई नसल्याचे स्पष्ट केले. काळाबाजार रोखण्यासाठी सरकार दक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, राज्यसभेत डॉ. ज्योती वाघमारे यांच्या बिनविरोध निवडीचेही त्यांनी स्वागत केले. शिवसेना खासदारांनी सभागृहात ठाम भूमिका मांडावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
या भेटीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मिलिंद देवरा, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे आणि रवींद्र वायकर उपस्थित होते.
तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री किरण रिजीजू आणि पियूष गोयल उपस्थित होते. संसदीय कार्यमंत्री रिजीजू यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या संसदीय कामकाजातील योगदानाची दखल घेतली.






