रत्नागिरी : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत कोकणचा विकास, गॅस पुरवठा आणि राजकीय घडामोडींवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांपासून ते गॅसच्या काळ्याबाजारापर्यंत त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. रत्नागिरी जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने मोठी पावले उचलली आहेत. पोयनार आणि न्यू मांडवे या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये दळणवळण सोयीचे व्हावे यासाठी नवीन साकव (छोटे पूल) बांधण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
गॅस पुरवठ्याबाबत जनतेला दिलासा
राज्यात घरगुती गॅसचा (LPG) कोणताही तुटवडा नसल्याचे सांगत कदम यांनी नागरिकांना रांगा न लावण्याचे आवाहन केले. "लवकरच इतर प्रदेशांतून गॅसचा पुरवठा सुरळीत होईल. मात्र, या काळात गॅसचा काळा बाजार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अन्न व औषध प्रशासनाला (FDA) कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. विशेषतः रुग्णालयांसारख्या अत्यावश्यक सेवांना गॅसचा पुरवठा प्राधान्याने केला जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊतांना प्रत्युत्तर आणि पोटनिवडणूक
संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना कदम म्हणाले की, सरकार कोणत्याही जिल्ह्याशी दुजाभाव करत नाही; राऊत यांचे काम केवळ टीका करण्याचे आहे. तसेच, आगामी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत महायुतीचे तिन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लवकरच समन्वय साधून योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंडणगड तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा बहुमान दिल्याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. या पदामुळे तालुक्याच्या विकासाला नवी उभारी मिळेल, असेही ते म्हणाले.






