Monday, March 16, 2026

बायपास शस्त्रक्रीयेसाठी एक रुपयाही खर्च येत नाही!

बायपास शस्त्रक्रीयेसाठी एक रुपयाही खर्च येत नाही!

आरोग्य मंत्र्यांची विधानसभेत माहिती; रुग्णालयांनी पैसे मागितल्यास त्वरित कारवाई करणार

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना बायपास शस्त्रक्रियेसाठी स्वतःच्या खिशातून एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. 'आयुष्मान भारत' आणि 'महात्मा फुले जनआरोग्य' या योजनांच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली जाते. जर एखाद्या रुग्णालयाने या उपचारांसाठी पैसे मागितले, तर त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सरकारी आरोग्य योजनांच्या सद्यस्थितीवर जोरदार चर्चा झाली. यावेळी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींकडे लक्ष वेधले. त्यांनी विठ्ठल कदम या शेतकऱ्याचे उदाहरण सभागृहासमोर मांडले. "बायपास शस्त्रक्रियेसाठी साधारण ११ लाख रुपये खर्च येतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांतून ६ लाख रुपयांपर्यंत मदत मिळण्याची तरतूद असताना, संबंधित रुग्णालयाने या शेतकऱ्याला केवळ १ लाख रुपयेच मदत मिळेल असे सांगितले. परिणामी, पैसे नसल्यामुळे या शेतकऱ्याची शस्त्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासून रखडली आहे. ६ लाख रुपये देण्याची तरतूद कागदावर असताना रुग्णाला प्रत्यक्षात १ लाखच का दिले जातात?" असा सवाल लोणीकर यांनी उपस्थित केला.

लोणीकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, पूर्वी या योजनांमध्ये काही मर्यादा होत्या, मात्र आता केंद्राची आयुष्मान भारत योजना राज्याच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी जोडण्यात आली आहे. यामुळे उपचारांसाठी मिळणाऱ्या निधीची मर्यादा वाढवण्यात आली असून बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रिया आता पूर्णतः मोफत होणे बंधनकारक आहे. रुग्णालयांनी कोणत्याही तांत्रिक कारणास्तव रुग्णाला परतावा देण्यास नकार दिल्यास किंवा अतिरिक्त पैशांची मागणी केल्यास त्याबाबत तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

योजनांच्या प्रचारासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे

प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांच्या स्तरावर या योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्र्यांनी यावेळी केले. बायपाससाठी एकाही पैशाची गरज नाही. ज्या रुग्णालयांनी पैसे मागितले आहेत, त्यांची माहिती आम्हाला द्या, आम्ही त्यांच्यावर त्वरित कारवाई करू, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >