नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी बाजार येथे कोकणातून येणाऱ्या आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. तब्बल सहा हजार पेट्या बाजारात दाखल झाल्याने आंबा खवय्यांसाठी ही एक पर्वणी ठरली आहे. मात्र आंब्याचे दर अजूनही वरचढ असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
मागील काही दिवसांपासून कोकणातून येणाऱ्या आंब्याची आवक वाढू लागली असून आज नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात तब्बल सहा हजार पेट्यांची आवक झाली आहे. चालू हंगामातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवक असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र वातावरणातील सतत होणारे बदल, धुके आणि तापमानातील चढउतार यामुळे आंबा पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा खराब होऊन कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सध्या बाजारात एका पेटीचा दर सुमारे चार हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत आहे. पुढील काही दिवसांत आंब्याची आवक वाढण्याची शक्यता असली तरी दर मात्र वरचढ राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कोकणातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता आंबा खवय्यांनी थोडीशी खिशाला कात्री देत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहनही आंबा व्यापाऱ्यांकडून करण्यात आले आहे.






