कथा : रमेश तांबे
सुरज एक शाळकरी मुलगा होता. हातात पिशवी नाही की खिशात पैसे नाहीत. बाबांच्या टोचून बोलण्याचा त्याला प्रचंड राग आला होता. त्यामुळे रागारागात तो रेल्वेत बसला आणि निघाला दूर कुठेतरी. एका मागून एक स्टेशन्स मागे पडत होती. त्याला झोप लागली अगदी गाढ. कुणीतरी तिकीट तिकीट असं ओरडलं तेव्हा तो जागा झाला. त्याने डोळे उघडले तर समोर काळ्या कोटातला टी.सी. उभा. सुरजने तिकीट नाही असं म्हणताच टी.सी. म्हणाला, “पाचशे रुपये” दंड भरावा लागेल. पण सुरजकडे पाचशे रुपये काय पाच पैसेदेखील नव्हते.
पुढचे स्टेशन येताच टी.सी.ने सुरजला स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात नेले. तेव्हा साहेब म्हणाले, “काय रे कुठून पकडून आणलेस या मुलाला.” साहेब या मुलांना फुकट फिरायची सवय असते. याला योग्य ती शिक्षा मिळालीच पाहिजे. साहेबाने मुलाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरचे करूण भाव बघून त्यांच्या हृदयात कालवाकालव झाली. या मुलाचं काय करायचं ते तुम्हीच ठरवा साहेब असं म्हणून टी.सीं.नी त्यांचा निरोप घेतला. इतका वेळ सुरज मान खाली घालून उभा होता. आता साहेब जागेवरून उठले आणि सुरजला एका बाकड्यावर बसवून ते स्वतः त्याच्या शेजारी बसले. डोक्यावर हात फिरवत त्याच्या डोळ्यांत पाहत म्हणाले, “काय रे मुला तुझं नाव काय? एकटाच कुठे निघालास? कुठून आलास?” साहेबांच्या प्रश्नांची मालिका काही संपत नव्हती.
“काका माझं नाव सुरज महादेव सुर्वे. वय १५, राहणार मुंबई. काल बाबांचं आणि माझं खूप भांडण झालं. मला त्यांनी मारलं. नको नको ते बोलले. आईसुद्धा गप्पच होती. मग ठरवलं घर सोडून निघून जायचं. वाट मिळेल तिथं.” साहेब म्हणाले, “अरे सुरज, असा राग नाही घालून घ्यायचा डोक्यात. तू मला तुझा पत्ता सांग, मी तुला परत पाठवण्याची व्यवस्था करतो.” सुरज म्हणाला, “पण काका मला नाही जायचं घरी. माझं बाबांशी भांडण झालंय.” “अरे, पण मग काय झालं. ते तुझे बाबा आहेत. ते नक्कीच तुला माफ करतील. शिवाय तुझी आई रडून रडून थकली असेल रे बाळा” मग सुरज सांगू लागला, “पण घरी जाऊन करू तरी काय. बाबांनी स्वतःच मला शाळेतून काढून टाकलंय. खरं तर मला खूप शिकायचंय पण बाबा म्हणतात शिकून काय करायचं. त्यापेक्षा काम कर!”
साहेबांच्या लक्षात आलं. पोराला शाळेत जायचंय, शिकून मोठं व्हायचंय. बाबांनी शाळेत जायचं नाही असं म्हटल्यामुळेच हा रागावलाय बाबांवर. ते म्हणाले, “घाबरू नकोस. मी तुझ्या शिक्षणाची जबाबदारी घेतो. तुझा सर्व खर्च मी करीन. मग तर झालं.” या एका अटीवर सुरज घरी जायला तयार झाला. मग साहेब दुसऱ्या दिवशी स्वतः सुरजला घेऊन त्याच्या घरी गेले. सुरजला पाहताच बाबांच्या डोळ्यांत पाणी आलं, आई त्याला कुशीत घेऊन रडू लागली. साहेब म्हणाले, “बघा, सुरज हा खूप गुणी मुलगा आहे. त्याला शिकू द्या. तुम्हाला शक्य नसेल तर मी त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च करेन.” हे सांगताच सुरजचे आई-बाबा हमसून हमसून रडू लागले. साहेब जाता जाता म्हणाले, “पोराला सांभाळा. मी माझ्या मुलाला तीस वर्षांपूर्वी असंच गमावलंय.” असं म्हणत त्यांनी खिशातल्या रुमालाने आपले अश्रूंनी डबडबलेले डोळे पुसले अन् तेथून निघाले.






