पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात आणि बाहेरगावी फिरायला जायचे वेध लागलाय सुरु होतात. त्यामुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
या पार्श्वभूमीवर वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यासह देशातील विविध मार्गांवर एकूण १४८४ उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या गाड्यांमध्ये ७४९ आरक्षित तर ७३५ अनारक्षित गाड्यांचा समावेश असणार आहे. प्रवाशांच्या मागणीचा विचार करून या गाड्या चालवण्यात येणार असून आवश्यकतेनुसार आणखी काही अतिरिक्त गाड्याही सोडल्या जाऊ शकतात, असे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.
या काळात पर्यटनस्थळांसह आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्या वाढते. सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी अनेकजण रेल्वेचा पर्याय निवडत असल्याने तिकीट आरक्षण सुरू होताच अनेक गाड्यांमध्ये वेटिंगची संख्या झपाट्याने वाढते. काही गाड्यांमध्ये वेटिंग २०० ते ४०० पर्यंत पोहोचत असल्याचेही दिसून येते.
यामुळे राज्यातील काही महत्त्वाच्या मार्गांवरही विशेष गाड्या धावणार आहेत. त्यामध्ये मुंबई किंवा दौंड ते सोलापूर, पुणे ते कोल्हापूर, नाशिक रोड ते बडनेरा तसेच हडपसर ते हरंगुळ या मार्गांचा समावेश आहे.
तसेच महाराष्ट्राबाहेरील प्रवासासाठीही काही विशेष रेल्वे सेवा सुरू केल्या जाणार आहेत. मुंबई ते बलिया, मुंबई ते गोरखपूर, दौंड ते कलबुर्गी तसेच सोलापूर ते कलबुर्गी आणि अनकापल्ली या मार्गांवरही विशेष गाड्या धावणार आहेत. वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर या विशेष सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






