इराणकडून मैत्रीचा हात पुढे
नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला आहे. पण या संकट काळातही इराणने भारतासाठी मैत्रीचा हात पुढे केला आहे. ‘भारत आमचा मित्र आहे व त्यांच्या जहाजांना कोणताही धोका पोहोचणार नाही,’ असे इराणने स्पष्ट केले आहे.
'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून भारतीय जहाजांना सुरक्षित रस्ता देण्याची घोषणा इराणच्या राजदूतांनी केली आहे. राजदूतांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वाढता दबदबा आणि इराण-भारत संबंधांच्या मजबुतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला जोडणारा एक अरुंद पण मोक्याचा जलमार्ग आहे. भारतासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताला मिळणाऱ्या एकूण कच्च्या तेलाचा मोठा हिस्सा याच मार्गावरून येतो. भारताची अनेक व्यापारी जहाजे याच मार्गाने आखाती देशांकडे रवाना होतात.






